२०३० मध्ये चंद्रामुळे समुद्राला मोठी भरती? | पुढारी

२०३० मध्ये चंद्रामुळे समुद्राला मोठी भरती?

वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षांत ऋतुचक्र सातत्यानं बदलतंय. जगाला महाभयंकर अशा वादळांचा, पुराचा सामना करावा लागतोय. त्यातच आता नासानं एक धोक्याचा इशारा दिलाय. चंद्रामुळे पृथ्वीवर विनाशकारी महापूर येईल अशी भीती नासानं व्यक्त केलीय. समुद्राच्या महाकाय लाटा संपूर्ण शहर उद्ध्वस्त करून टाकतात. येत्या काळात पृथ्वीवर एक असं संकट येणार आहे, ज्यामुळे सगळी पृथ्वीच जलमय होणार आहे. पृथ्वीवरच्या या विनाशकारी महाप्रलयाला कारणीभूत असेल साडेतीन लाख किलोमीटर दूर असलेला चंद्र. नासाच्या अभ्यासानुसार 2030 मध्ये समुद्राच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे समुद्राला प्रचंड मोठी भरती येईल. ज्यामुळे पृथ्वीचा बराचसा भाग जलमय होईल.

या विनाशकारी महाप्रलयाचं कारण असेल चंद्र… कारण चंद्र आपली जागा बदलत असल्यानं अक्राळविक्राळ भरतीच्या लाटा धडकणार आहेत. नेचर जर्नलमध्ये नासाचा हा अहवाल प्रसिद्ध झालाय. नासाची भविष्यवाणी खरी ठरली तर किनारी भागात सातत्यानं पूरस्थिती निर्माण होईल. शिवाय या महाप्रलयामुळे होणार्‍या नुकसानीचं प्रमाण खूप जास्त असेल. घरं, रस्ते, सार्वजनिक ठिकाणं पाण्याखाली जातील. सततच्या प्रलयामुळे लोकांचं जगणं कठीण होऊन बसेल.

चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्रात भरती-ओहोटीची प्रक्रिया सुरू असते. चंद्रामुळेच आतापर्यंत समुद्र संतुलित राहिलाय. पण चंद्राने आपल्या कक्षेत जराही बदल केला तर हे संतुलन बिघडणार. नासाच्या दाव्यानुसार चंद्र दर साडेअठरा वर्षांनी मूळ जागेपासून हलकासा सरकतो. अर्ध्या काळात तो समुद्रातील लाटांवर दबाव निर्माण करतो तर अर्ध्या काळात लाटांचा वेग वाढवतो. नासाच्या म्हणण्यानुसार आता लाटांचा वेग वाढण्याचा काळ आहे. ही प्रक्रिया 2030 पर्यंत सुरू होईल. या काळात समुद्राची पातळी प्रचंड प्रमाणात वाढलेली असेल आणि असं झालं तर मोठ्या विनाशाची शक्यता आहे.

Back to top button