भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय? | पुढारी

भाजप-मनसे युतीचा नाशिकमधून सुरू होणार अध्याय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीची चर्चा होत असल्याची कुजबूज असली तरी, भाजप-मनसे युतीचा नवा अध्याय नाशिकमधून लिहिला जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या महत्त्वाकांक्षी ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील गोदापार्कला पुनरुज्जीवित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या माध्यमातून भाजपने एक प्रकारे मनसेच्या दिशेने मैत्रीचे पहिले पाऊल टाकल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेत असो व मनसेत राज ठाकरे यांचे नाशिकवर कायम प्रेम राहिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या गत निवडणुकीपूर्वी नाशिकला दत्तक घेतल्याची घोषणा केली असली तरी राज ठाकरे यांनी त्यापूर्वीच नाशिककरांना नवनिर्माणाचा शब्द दिला होता. गोदावरीचे सौंदर्य जपण्यासाठी तसेच गोदाकाठ अतिक्रमणमुक्त राहण्यासाठी राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून २००२ मध्ये महत्त्वाकांक्षी गोदापार्कची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यावेळी ते शिवसेनेत होते. साबरमतीच्या धर्तीवर गोदाघाट विकासाची मूळ योजना होती. गोदावरीच्या पुरात गोदापार्कची वाताहत झाली तशीच काळाच्या ओघात मनसेचीही पडझड झाली. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत मनसेला दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर नाराज झालेल्या राज ठाकरे यांचे नाशिककडे काहीसे दुर्लक्ष झाले. मनसेच्या सत्ताकाळात उभारलेल्या प्रकल्पांची वाट महापालिकेतील सत्तांतरानंतर बिकट बनली. गोदापार्क जवळपास नामशेष झाला. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे युतीचे वारे वाहू लागले आहेत. गेल्या आठवड्यातच भाजपचे आशिष शेलार आणि मनसेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीचा विषय वेगळा असला तरी दोन्ही पक्षांमध्ये युती होणार, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली. आता नाशिकमध्ये भाजपच्या संकल्पनेतील ‘नमामि गोदा’ प्रकल्पांतर्गत गोदाघाट विकासाचा एक भाग म्हणून गोदापार्क पुनरुज्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गोदेकाठी ग्रीनबेल्ट तयार करणार

नमामि गोदा प्रकल्पाचा प्रारूप आराखडा सल्लागार संस्थेमार्फत नुकताच आयुक्तांना सादर करण्यात आला. या आराखड्यानुसार गोदावरीसह उपनद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी मलनिस्सारण व्यवस्थेच्या सक्षमीकरणाबरोबरच गोदाघाट विकासाचा भाग म्हणून गोदापार्क प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा संकल्प आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून गोदापार्कच्या माध्यमातून ग्रीन बेल्ट तयार केला जाणार आहे. आसारामबापू पुलाच्या पलीकडे अस्तित्वातील गोदापार्कची पुनर्बांधणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button