Yashasvi Jaiswal : जैस्वाल 800 चा टप्पा गाठणार? ‘पहिला’ भारतीय फलंदाज बनण्याची संधी | पुढारी

Yashasvi Jaiswal : जैस्वाल 800 चा टप्पा गाठणार? ‘पहिला’ भारतीय फलंदाज बनण्याची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील 4 सामने झाले आहेत. भारतीय क्रिकेट संघ मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 4 कसोटी सामन्यांच्या 8 डावात 93.57 च्या सरासरीने 655 धावा चोपल्या आहेत. यात दोन शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. या मालिकेत त्याची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 214 आहे.

धरमशाला येथे शेवटची कसोटी

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात 145 धावा करून जैस्वालला (Yashasvi Jaiswal) इतिहास रचण्याची संधी आहे. जर त्याने हा पल्ला गाठला तर एका कसोटी मालिकेत 800 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय ठरेल.

सध्या सुनील गावसकर अव्वल स्थानी

सध्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी क्रिकेटर सुनील गावसकर (sunil gavaskar) यांच्या नावावर आहे. त्यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 4 कसोटी सामन्यांच्या 8 डावात 154.80 च्या सरासरीने 774 धावा फटकावल्या होत्या. यामध्ये त्याच्या 4 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 220 होती. ती कसोटी मालिका भारताने वेस्ट इंडिजमध्ये खेळली होती.

संबंधित बातम्या

700+ धावा करणारे सुनील गावसकर हे एकमेव भारतीय

एका कसोटी मालिकेत 700 किंवा त्याहून अधिक धावा करणा-या भारतीय फलंदाजांच्या यादीत सुनील गावसकर (sunil gavaskar) हे एकमेव आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत दोनदा असा पराक्रम केला आहे. गावसकर यांनी 1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या 6 कसोटी सामन्यांच्या घरच्या मालिकेतील 9 डावात 91.50 च्या सरासरीने 732 तडकावल्या होत्या. त्यात 4 शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. त्या मालिकेत त्यांची सर्वोच्च धावसंख्या 205 धावा होती.

तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली

या यादीत विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2014 मध्ये, विराट कोहलीने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या 8 डावांमध्ये 86.50 च्या सरासरीने 692 धावा कुटल्या होत्या. त्यात 4 शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. त्या मालिकेत कोहलीची सर्वोच्च धावसंख्या 169 होती. जैस्वाल सध्या या यादीत विराट कोहलीसह संयुक्त चौथ्या स्थानावर आहे.

2016 मध्ये, विराट कोहलीने घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या 8 डावांमध्ये 109.16 च्या सरासरीने 655 धावा केल्या होत्या. त्यात 2 शतके आणि 2 अर्धशतकांचाही समावेश होता आणि सर्वोच्च धावसंख्या 235 होती. जैस्वालनेही चालू मालिकेत आतापर्यंत 655 धावा केल्या आहेत.

भारतासाठी कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

774 धावा : सुनील गावसकर : विरुद्ध वेस्ट इंडिज 1971
732 धावा : सुनील गावसकर : विरुद्ध वेस्ट इंडिज 1978
692 धावा : विराट कोहली : विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2014
655 धावा : विराट कोहली : विरुद्ध इंग्लंड 2016
655* धावा : यशस्वी जैस्वाल : विरुद्ध इंग्लंड 2024

Back to top button