Parliament security breach : संसद सुरक्षा भंग प्रकरणाला बेरोजगारी आणि महागाई कारणीभुत; राहुल गांधी | पुढारी

Parliament security breach : संसद सुरक्षा भंग प्रकरणाला बेरोजगारी आणि महागाई कारणीभुत; राहुल गांधी

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसदेतील सुरक्षा भंगावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. संसद सुरक्षा भंगात बेरोजगारी आणि महागाई हे कारण असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून केंद्र सरकारवर त्यांनी जोरदार ताशेरे ओढले. राहुल गांधी यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

लोकसभेत सुरक्षेचा भंग झाला. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांमुळे झालेली बेरोजगारी आणि महागाई कारणीभुत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. नोकऱ्या नाहित, तरुण हतबल आहेत. आपण या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरुणांना नोकऱ्या द्याव्या लागतील. संसद सुरक्षा भंगात सुरक्षेतील त्रुटी नक्कीच आहे, पण त्यामागचे कारण म्हणजे देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी केलेल्या आरोपावर भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी कधीही निराश करत नाही.  नेहमीच काहीतरी कचरा बोलतात. असे म्हटले आहे. तसेच भारतातील बेरोजगारी ३.२% आहे, जी सहा वर्षांतील सर्वात कमी बेरोजगारी असल्याचेही ते म्हणाले. राहुल गांधींनी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांशी संसद सुरक्षा भंगातील लोकांचे संबंध स्पष्ट केले पाहिजेत. राहुल गांधींनी विशेषतः वकील असीम सरोदे यांच्याशी त्यांचे संबंध स्पष्ट केले पाहिजेत, असीम सरोदे भारत जोडो यात्रेचा भाग होते आणि घुसखोरांना कायदेशीर मदत देण्याची ऑफर त्यांनी दिली होती, असेही मालवीय पुढे म्हणाले.

Back to top button