कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याला गती | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याला गती

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याला आता गती आली आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या आठ दिवसांत ती पूर्ण होणार आहे. यामुळे जानेवारी महिन्यात हा आराखडा राज्य शासनाला सादर होईल, याद़ृष्टीने प्रक्रिया सुरू आहे.

अंबाबाई मंदिरात दरवर्षी भाविकांची संख्या वाढत चालली आहे. राज्यातूनच नव्हे, तर देशभरातून भाविक कोल्हापुरात येऊ लागले आहेत. भाविकांच्या वाढत्या संख्येने पुरविण्यात येणार्‍या सेवासुविधा आणि सुरक्षितता, याकरिता अंबाबाई मंदिर परिसरात कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. याकरिता या परिसराचा पुनर्विकास करण्याचा विचार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अंबाबाई मंदिराभोवतालचा सर्व परिसर खुला करून त्याचा योग्यप्रकारे विकास केला जाणार आहे. त्याद्वारे भाविकांना सुविधा देण्याबरोबरच सुरक्षिततेच्या द़ृष्टीनेही आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. याकरिता अंबाबाई मंदिराच्या चारही बाजूला, भाऊसिंगजी रोड, जोतिबा रोड, महाद्वार रोड आणि बिनखांबी गणेश मंदिर रस्ता, असा सुमारे साडेतीन एकरचा परिसर विकसित होणार आहे.

या परिसरातील रहिवासी, दुकानदार, व्यापारी यांच्याशी सध्या चर्चा सुरू आहे. त्यांच्या देवस्थान समिती प्रशासनाकडून बैठकाही घेतल्या जात आहेत. या परिसरात येणार्‍या मिळकतधारकांकडे प्रशासनाने जागा संपादनासाठी संमतीबाबत पत्रे पाठवली होती, त्यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, या परिसराच्या पुनर्विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सल्लागार नियुक्तीसाठी निविदा काढली होती. त्यानुसार दाखल झालेल्या निविदांतून अंतिम सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. ती आठ दिवसांत पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले. सल्लागार नियुक्ती झाली की, त्यांच्याकडून महिन्याभरात आराखडा तयार करून घेतला जाणार आहे. या परिसराचा तयार झालेला आराखडा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, परिसरातील रहिवासी, व्यापारी यांच्यापुढेही सादर केला जाईल. यानंतरच तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही रेखावार यांनी सांगितले.

पुनर्विकासात हे होईल

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यानुसार परिसरात मोकळी जागा, त्यात दर्शन मंडप, स्वच्छतागृहे, महिला भाविकांसाठी विशेष बैठक व्यवस्था, व्यापारी संकुल, माहिती केंद्र, कार्यालय, सुशोभीकरण आदी कामे पुनर्विकास आराखड्यात होणार आहेत.

जोतिबा प्राधिकरणाचा प्रस्ताव लवकरच सचिव समितीसमोर

दरम्यान, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जोतिबा विकास प्राधिकरणाबाबत बैठक झाली. या बैठकीत प्राधिकरणाच्या आराखड्याचे सादरीकरण झाले. त्यात असलेल्या काही त्रुटी दूर करून हा आराखडा पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्यासमोर सादर केला जाईल, यानंतर डिसेंबरअखेर प्राधिकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या सचिव समितीसमोर सादर केला जाईल, असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

Back to top button