Uddhav Thackeray : शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा विचार करू नये, शिवसेना तुमच्या पाठिशी : उद्धव ठाकरे
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, असे आवाहन करून शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा विचार करू नये. त्याचबरोबर आत्महत्येचा विचारही करू नये, ही हात जोडून विनंती, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले. Uddhav Thackeray
आज (दि. १) मातोश्री येथे हिंगोलीतील शेतकऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे माध्यमांशी बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचा गुन्हा काय ? हे सरकारने सांगावे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी नायालक म्हटले, तर लगेच यांना लागले, असा टोला ठाकरे यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चे काढा, शेतकऱ्यांची काय ताकद असते, ते एकदा दाखवून द्या. सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवा, असे आवाहन ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना यावेळी केले. Uddhav Thackeray
पीक विम्याचे पैसे कंपनीच्या माध्यमातून कोणाच्या खिशात जात आहेत, असा आरोप करून विमा कंपनीचे कार्यालये बंद आहेत. कंपन्या सरकारचे काहीही ऐकत नाही. पंतप्रधान फसल योजना हा एक घोटळा आहे की काय ? अशी शंका आता येऊ लागली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, अविचार करू नये, कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असे आश्वस्त ठाकरे यांनी केले.
पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या! माझ्या बळीराजाला न्याय द्या!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 1, 2023
हेही वाचा