Manoj Jarange-Patil : मुख्यमंत्र्यांचे चर्चेचे आमंत्रण जरांगे-पाटलांनी फेटाळले; बुधवारपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा | पुढारी

Manoj Jarange-Patil : मुख्यमंत्र्यांचे चर्चेचे आमंत्रण जरांगे-पाटलांनी फेटाळले; बुधवारपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज मराठा उपसमितीची बैठक घेतली. या बैठकीत शिंदे समितीने सादर केलेला प्राथमिक अहवाल स्वीकारला आहे. या अहवालानुसार जुन्या नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी आज (दि.३०) दिली. यावर मनोज जरांगे- पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत अर्धवट आरक्षण मान्य नसल्याचे सांगितले. (Manoj Jarange-Patil)

ते पुढे म्हणाले की, मला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा फोन आला होता. जुन्या नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचे ते म्हणाले. याबाबत सरकारने समितीचा प्रथम अहवाल स्वीकारला आहे. तर उद्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक बोलावली आहे. पुरावे सापडलेल्या मराठ्यांना अर्धवट प्रमाणपत्र दिले, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. (Manoj Jarange-Patil)

फक्त मराठवड्यातील नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्या, अर्धवट किंवा फक्त मराठवाड्यातील मराठयांसाठी आरक्षण मी घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे – पाटील यांनी घेतली आहे. राज्य सरकारने मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप करू, यावर ते म्हणाले, पुरावे कुठेही मिळो पण आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला द्यावे लागेल. त्यासाठी फक्त मराठवाड्यातील नव्हे, संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलवा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट आरक्षण दिलं तरच आंदोलन थांबणार अन्यथा नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षणासाठी आणखी वेळ मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे. यावर आणखी किती वेळ द्यायचा असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आणखी म्हणजे किती हे सांगावं मग वेळ द्यायचा की नाही याबाबत निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

सरकारमधील मंत्र्यांचे लोक मराठ्यांच्या वाटेला जात असल्याने आंदोलक आक्रमक होत असल्याचे जरांगे म्हणाले. माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची जाळपोळ झाली. प्रकाश सोळंके हा खोडीचा माणूस आहे, तो काहीतरी म्हणाला असेल, त्याला मराठ्याने मोठा केला आहे. तो आता सोसायटीला निवडून येऊ शकत नाही. मराठ्यांच्या जीवावर मोठा झाला आहे. त्याने आधी खोडी केली असेल, असे जरांगे म्हणाले.

Manoj Jarange-Patil : क्युरेटिव्ह पिटीशन आणि आमचा काही संबंध नाही.

क्युरेटिव्ह पिटीशन आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. पण मराठा आरक्षणाबाबत तुम्ही पंतप्रधानांना काही बोलले का? याच आधी उत्तर द्या, असे सांगत क्युरेटिव्ह पिटीशन सरकारने आमच्या सभेच्या आधी दाखल केल्याचा आरोप जरांगेनी केला . केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरेटिव्ह पीटीशनची तारीख पडू शकत नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं चर्चेला येण्याचं आमंत्रण नाकारलं

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत चर्चेला बोलावल्याचे आमंत्रण मनोज जरांगे यांनी नाकारले आहे. मी अर्धवट आरक्षण घेणार नाही. सरसकट महाराष्ट्राचे आरक्षण घेईल. अर्धवट आरक्षण दिले तर त्या जीआरला हात लावणार नाही, असे सांगत गाव आणि सगळी वेस मंत्र्यांना उघडी ठेवली, तरी हे इथे चर्चेला येत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तुम्हाला इथे कोणताही धोका नाही, असेही जरांगे म्हणाले.

अन्यथा आग्या मोहळ घेऊन तिथे येईल.

माजलगावचा प्रकार आमच्या मराठ्यांच्या पोरांनी केले नसेल. त्यामुळे पोलिसांनी आमच्या लोकांच्या नादाला जाऊ नये, अन्यथा आग्या मोहळ घेऊन तिथे जाईल, असा इशाराही त्यांनी पोलिसांना दिला.

वाचाळवीर नेत्यांना आवरा

वाचाळवीर मंत्र्यांना आवरा वाचाळवीर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावे, आमचे लोक शांततेत आंदोलन करत असल्याचे जरांगे म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button