चंद्रपूर विधानसभेवर आरपीआय-आठवले गटाचा दावा | पुढारी

चंद्रपूर विधानसभेवर आरपीआय-आठवले गटाचा दावा

 चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर विधानसभेवर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार निवडुन आले आहेत. भाजप ही जागा जिंकू शकली नाही. चंद्रपुरात आंबेडकरी चळवळ मजबूत आहे, सोबत आरपीआय इतर समाजाला देखील सोबत घेते. त्यामुळे ही जागा आरपीआयच्या वाट्याला यावी अशी इच्छा व्यक्त करीत चंद्रपूर विधानसभेच्या जागेवर चंद्रपूरात येऊन दावा ठोकला. ही जागा मिळाली तर इतर समाजाला जोडण्यासाठी, सोबत घेण्यासाठी देखील आरपीआय प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. धम्मचक्र अनुप्रवर्तनदिनी ते चंद्रपूरात आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, मागच्या वेळी एनडीएला 42 जागा लोकसभा निवडणुकीत मिळाल्या होत्या. आता तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार पण सोबत आहेत, त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत 40 पेक्षा अधिक जागा आपण निवडून आणू असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी उप मुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढला. ते म्हणाले पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता एक धक्कादायक खुलासा करण्यात आल्याने त्याची राज्यात चर्चा सुरू आहे. यामध्ये अजित पवारांनी येरवडा तुरुंगाच्या बाजूचा भूखंड विक्री करण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण सध्या चर्चेत असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या मीश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली. येरवडा तुरुंगाच्या बाजूला जमीन घेऊन इमारत बांधणे हे चुकीचे असून तुरुंगाच्या बाजूला इमारत बांधल्यास कधी तुरुंगात जावे लागेल असा टोला हाणला. मीरा बोरवणकर ह्यांच्या पोलीस कारकिर्दीत त्यांचा सर्वत्र दरारा राहिलेला आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अजित दादांवर जे आरोप केले त्यावर आपण काही सांगू शकणार नाही. यात काय तथ्य आहे अथवा नाही हे खुद्द अजित पवारच सांगू शकेल असेही ते म्हणाले.

आधी 10 टक्के केंद्राचा निधी आता 60 टक्के

आपण केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री बनल्यापासून अनेक कामे आली. पूर्वी अनेक योजनांसाठी केंद्राचा केवळ दहा टक्के निधी दिला जात होता. मात्र आपण ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. आता 60 टक्के निधी हा केंद्राचा असतो तर 40% निधी हा राज्य सरकारचा असतो. यासाठी 15 हजार कोटींची अतिरिक्त तरतूद केली. परदेशात शिक्षण घेणाऱ्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

इंडिया हे नाव द्यायला नको

विरोधी पक्षाने आपल्या आघाडीला इंडिया हे नाव दिलं.मात्र इंडिया असं नाव देणे योग्य नव्हे, ते चूक आहे. इंडियावर आमचं प्रेम आहे. इंडिया हे देशाचं नाव आहे. मात्र जशी इंडिया पाकिस्तानची मॅच होते त्याचप्रमाणे आमची मॅच झाल्यास आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

Back to top button