भारतासाठी श्रीलंकेचा ‘ड्रॅगन’ला झटका, जाणून घ्‍या काय आहे प्रकरण? | पुढारी

भारतासाठी श्रीलंकेचा 'ड्रॅगन'ला झटका, जाणून घ्‍या काय आहे प्रकरण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आम्ही ऑक्टोबरमध्ये चिनी जहाजाला (China Ship)  श्रीलंकेत येऊ दिलेले नाही. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती, जी आमच्यासाठीही योग्य आणि अत्यंत महत्त्वाची आहे, असे श्रीलंकेचे परराष्‍ट्र मंत्री अली साबरी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. दरम्‍यान, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही विदेशी जहाज श्रीलंकेत येण्‍यासाठी कोणतीही विशेष सवलत देण्‍यात आली नसल्‍याची माहिती दिली आहे.

China Ship : भारताने व्‍यक्‍त केली होती चिंता

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी सोमवारी ( दि. २६) सांगितले की, आम्‍ही चिनी जहाजाला श्रीलंकेत थांबण्‍यास परवानगी नाकारली आहे. चिनी नौदलाचे जहाज Xin Yan 6 ऑक्टोबरमध्ये पूर्व श्रीलंकेच्या बंदरात सुमारे तीन महिने थांबणार होते. हे हेरगिरी असल्याची भीती दाखवत भारताने यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्र्यांचे महत्त्‍वाचे विधान समोर आले आहे. आम्हाला आमचा परिसर सुरक्षित ठेवायचा आहे, असे आम्ही नेहमीच म्हणत आलो आहोत, असेही त्‍यांनी नमूद केले आहे.

ऑक्टोबरमध्ये चीनचे एक संशोधन जहाज श्रीलंकेत येणार होते. हे जहाज श्रीलंकेत सागरी संशोधनासाठी येणार होते. अमेरिकन सरकारच्या सर्वोच्च मंत्री व्हिक्टोरिया नूलँड यांनीही याबाबत श्रीलंका सरकारकडे चिंता व्यक्त केली. श्रीलंकेत परदेशी जहाजांचे आगमन आणि त्याबाबत भारताच्या चिंता यावर अली साबरी म्हणाले की, ‘भारत दीर्घ काळापासून याबाबत चिंता व्यक्त करत आहे. अशा परिस्थितीत आम्ही एसओपी (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार केली आहे, जेव्हा आम्ही एसओपी बनवत होतो, तेव्हा आम्ही भारतासह अनेक मित्र देशांशी चर्चा केली होती. जोपर्यंत गोष्टी आमच्या SOP नुसार चालतात, तोपर्यंत आम्हाला कोणतीही अडचण नाही, परंतु SOP चे उल्लंघन झाल्यास आम्हाला समस्या असेल, असेही अली साबरी यांनी म्‍हटले आहे.

गेल्या वर्षीही चीनचे जहाज श्रीलंकेत झाले होते दाखल

‘आमच्या शेजारी काय घडत आहे, आमच्या सुरक्षेवर परिणाम करणारा कोणताही विकास हा साहजिकच आमच्या हिताचा विषय आहे.’ गेल्या वर्षीही चीनचे जहाज युआन वांग-5 श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर अनेक दिवस थांबले होते. हे चीनचे बॅलेस्टिक मिसाईल आणि सॅटेलाइट ट्रॅकिंग जहाज होते. भारताने यावर आक्षेप घेतला होता आणि भारताच्या सागरी मालमत्तेवर पाळत ठेवण्याची भीती व्यक्त केली होती. यावेळीही भारताला अशीच चिंता आहे, असेही साबरी यांनी म्‍हटले आहे.


हेही वाचा : 

 

 

 

Back to top button