Dhangar reservation : धनगर आरक्षणप्रश्नी 2 दिवसात मार्ग काढणार : उपमुख्यमंत्री फडणवीस | पुढारी

Dhangar reservation : धनगर आरक्षणप्रश्नी 2 दिवसात मार्ग काढणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणप्रश्नी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेवुन, यावर तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुरध्वनीवर दिले. मात्र उपोषणकर्ते आपल्या मागण्यावर ठाम राहिल्याचे ११ व्या दिवशीही तोडगा निघाला नाही. धनगर आरक्षणप्रश्री यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे गेली ११ दिवसापासून आमरण उपोषण चालु आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी (ता.१६) रात्री साडेआठ वाजता चोंडी येथे येवून आंदोलकांशी भेट घेतली. यावेळी आमदार प्रा राम शिंदे , रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरिक्षक महेश पाटील उपस्थित होते.

यावेळी मंत्री महाजन यांनी आंदोलकांशी तब्बल एक तास चर्चा केली. या चर्चेदरम्यान मंत्री महाजन यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकुण घेवुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलचा स्पीकर वाॅन करून फोन केला. यावेळी फडणवीस यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकुण घेत, धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच आहे. यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्नशील असून येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक घेवुन निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन दिले. दरम्यान उपोषणकर्ते यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, सुरेश बंडगर, यशवंतसेनेचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब दांगडे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीनंतरच आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

सरकारने आंदोलनाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आंदोलकांचा आरोप

घटनेत तरतूद असताना गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षण देण्यास चालढकल सुरू आहे. गेली ११ दिवसापासून आमरण उपोषण चालु आहे. मात्र या सरकारने आंदोलनाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

दोन दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास आम्ही औषधोपचार घेणार नाहीत

११ दिवस आंदोलन चालु असतानाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे किंवा अन्य एकही मंत्री आंदोलनाकडे फिरकला नाही. धनगरांविषयी या सरकारला एवढा राग का आहे? आम्ही एवढ्या दिवस तुमच्या पाठिशी राहिलो, मग आम्हाला वाऱ्यावर का सोडता. दोन दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास आपण औषधोपचार घेणार नाहीत आणि पाणीही सोडू असा निर्वाणीचा इशारा उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी दिला.

हेही वाचा

अहमदनगर : महिलेवर पेट्रोल ओतून ठार मारले; दोघांना जन्पठेपेची शिक्षा

PM Vishwakarma Yojana : ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेचा लाभ कसा मिळवायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ganeshotsav News : उत्सवांमध्ये डिजेचा वापर करु नका : राकेश ओला

Back to top button