Archery World Cup : 'तिरंदाजी वर्ल्डकप'मध्ये प्रथमेश जवकरला 'सुवर्ण'चा चकवा, 'रौप्य'वर मोहर
पुढारी ऑनलाईन डेस्क : शांघाय विश्वचषक विजेता भारतीय तिरंदाज प्रथमेश जवकर याला तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदकाने चकवा दिला. अंतिम सामन्यात सेट टार्गेट बोर्डवर लक्ष्याच्या जवळ जास्त शॉट्स मारल्यामुळे डेन्मार्कच्या मॅथियास फुलर्टनला याला विजेता घोषित करण्यात आले आणि प्रथमेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अंतिम फेरीत उत्कृष्ट तिरंदाजीचे प्रदर्शन, दोन्ही खेळाडूंचे गुण समान पण…
तिसर्या फेरीनंतर प्रथमेश ८९-९० असा एका गुणाने पिछाडीवर होता; पण चौथ्या फेरीत त्याने ३० पैकी ३० गुण मिळवले आणि गुणसंख्या ११९ अशी बरोबरी केली. यानंतर, पाचव्या आणि अंतिम फेरीत दोन्ही तिरंदाजांनी समान 29 गुण मिळवले. टायब्रेकरमध्येही दोघांचे गुण सारखेच राहिले. विजेतेपदाच्या लढतीत मॅथियास फुलर्टनला आणि प्रथमेश यांचे गुण 148-148 (10-10*) असे होते. मात्र सेट टार्गेट बोर्डवर लक्ष्याच्या जवळ जास्त शॉट्स मारल्यामुळे फुलर्टन याने सुवर्णपदक पटकावले तर प्रथमेश याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताचे कांस्यपदकही हुकले
प्रथमेशने उपांत्य फेरीत श्लोसरचा 150-149 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. श्लोसरने कांस्यपदकाच्या लढतीत अनुभवी खेळाडू अभिषेक वर्माचा 150-149 असा पराभव करून भारताला दुसरे पदक मिळू दिले नाही. वर्मा याआधी उपांत्य फेरीत फुलरटनकडून १४७-१५० असा पराभूत झाला होता.
Prathamesh Jawkar came agonizingly close to winning a World Cup Final gold medal, missing out by millimetres in the shoot-off.
🎥 World Archerypic.twitter.com/4i4V7pzY2t
— The Field (@thefield_in) September 10, 2023
महिला तिरंदाजांची निराशाजनक कामगिरी
या स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. भारताच्या आदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा वेन्नम या दोघीही पहिल्या फेरीतच बाद झाल्या. तर ज्योतीला कोलंबियाच्या सारा लोपेझने पाच गुणांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. सर्वांच्या नजरा विद्यमान विश्वविजेत्या अदिती स्वामीवर होत्या पण १७ वर्षीय युवतीला शूट-ऑफ फिनिशमध्ये अंतिम उपविजेत्या डेन्मार्कच्या 145-145 (9-10) ने उपविजेत्या तान्जा गेलेन्थिएनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
रिकर्व्ह प्रकारात सहभागी भारताचा एकमेव खेळाडू धीरज बोम्मादेवरा याला प्राथमिक फेरीत कोरियन हेवीवेट किम वूजिनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या वर्षीच्या अंतिम स्पर्धेसाठी भारताचे पाच खेळाडू पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ होती.