लव्ह जिहादविरोधी कायदा आणणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यात लव्ह जिहादसारखे प्रकार रोखण्यासाठी लवकरच कायदा आणणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. या कायद्यात कठोर कारवाईची तरतूद असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेत भाजपाचे ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे यांनी छत्रती संभाजीनगरमध्ये फुलंब्री गावात व आसपासच्या परिसरात हिंदू मुलींवर पाळत ठेवून काही समाजकंटक त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून, मुलींचे व्हिडिओ काढून त्यांना त्रास देत असल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
यावेळी झालेल्या चर्चेत सहभागी होताना भाजपाचे राम सातपुते यांनी काही तरुण खोटी नावे सांगून तरुणींना जाळ्यात ओढतात. अशा प्रकारांना बळी पडलेल्या तरुणींवर मानसोपचार करण्याची गरज आहे, असे म्हणाले. तर हरिश पिंपळे यांनी राज्यभरात लव्ह जिहादचे प्रकार वाढत असून सरकारने त्याविरोधात कायदा करावा, अशी मागणी केली.
या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, तरुणींना फूस लावून पळवून घेऊन जाणारे प्रकार रोखण्यासाठीची कार्यप्रणाली पोलीस महासंचालकांमार्फत राज्यभरातील पोलीस ठाण्यांकडे पाठविली जाईल. तसेच अशा प्रकरणांमध्ये तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलीस कर्मचार्याविरोधातही कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच बळी पडलेल्या तरुणी, महिलांना सेलमार्फत मानसोपचार दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.