एकही विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही : दीपक केसरकर | पुढारी

एकही विद्यार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही : दीपक केसरकर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आधार पडताळणी तसेच बिंदूनामावलीचे काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी शालेय शिक्षण आयुक्तांच्या पातळीवर दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. दोनवेळा नाव असणे अथवा बनावट विद्यार्थी शोधून हे प्रकार थांबवण्यासाठी आधार पडताळणी आवश्यक आहेे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांवर या पडताळणीचा कोणताही परिणाम होत नाही. सर्व विद्यार्थ्यांना या योजनांचे लाभ दिले जात असल्याचेही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

शिक्षक भरतीबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. दोन टप्प्यांत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असल्याचे केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. ही प्रक्रिया थांबवलेली नसून, विद्यार्थ्यांची आधार पडताळणी तसेच जिल्हानिहाय बिंदुनामावलीचे काम पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

विधान परिषद सदस्य किरण सरनाईक यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावर मंत्री केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांची 91.4 टक्के आधार पडताळणी पूर्ण झाली आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 80 टक्के पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तोपर्यंत 50 टक्के पदे भरण्यात येणार आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत सतेज पाटील, कपिल पाटील, निरंजन डावखरे, अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला.

शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना नाहीच

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याचे कोणतेही धोरण नाही, असे केसरकर यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य कपिल पाटील यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी तसे स्पष्ट केले. चर्चेत सत्यजित तांबे, जयंत आसगावकर यांनी सहभाग घेतला.

Back to top button