नाशिक : नांदगाव- मालेगाव रोडवर अपघातात तिघे ठार | पुढारी

नाशिक : नांदगाव- मालेगाव रोडवर अपघातात तिघे ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जालना येथे लग्नास हजेरी लावून घराकडे परतणाऱ्या कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला. नांदगाव- मालेगाव रोडवरील नागासाक्या धरणाच्या पुलावरून नदीत कार कोसळून झालेल्या अपघातात चारवर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. सोमवारी (दि.29) मध्यरात्री 1 च्या सुमारास ही घटना घडली. कारचालकास झोप लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

डॉ. याकुब रमजान मन्सुरी (५०, रा. दरेगाव, सायने, ता. मालेगाव), अफरोज अब्दुल लतीफ मन्सुरी (३५) व शिफा वसीम मन्सुरी (४, दोघे रा. करंजकर गल्ली, भगूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मन्सुरी कुटुंबीय एमएच ४१ बीई १०२२ क्रमांकाच्या कारने जालना येथे लग्नसोहळ्यासाठी गेले होते. तेथून परतताना मध्यरात्री 1 ला धरणाच्या पुलावर कारचालक डॉ. याकुब मन्सुरी यांचे कारवरील नियंत्रण सुटले. कार पुलाच्या कठड्यावरून नदीत पडली. त्यात शिफा हिच्यासह अफरोज व डॉ. याकुब यांचा मृत्यू झाला, तर नजमा याकुब मन्सुरी (४५), मिस्बाह याकुब मन्सुरी (३०), अबुजर याकुब मन्सुरी (२५), अयान याकुब मन्सुरी (२५, सर्व रा. दरेगाव, ता. मालेगाव), सुमय्या वसीम मन्सुरी (२८), सारा वसीम मन्सुरी (३), वसीम अब्दुल लतीफ मन्सुरी (३५, सर्व रा. भगूर) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात कारचालक डॉ. याकुब मन्सुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button