अरुण वैद्य खून खटल्यातील साक्षीदार आदिनाथ साळवेंच पुनर्वसन | पुढारी

अरुण वैद्य खून खटल्यातील साक्षीदार आदिनाथ साळवेंच पुनर्वसन

पुणे, पुढारी ऑनलाईन : जनरल अरुण वैद्य खून खटल्यातील दुर्लक्षित जीवन जगत असलेला साक्षीदार आदिनाथ साळवे (वय-६५) यांना चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ यांनी मदतीचा हात देऊन त्यांच्या मानसिक-सामजिक पुनर्वसनाची जबादारी घेतली आहे.

आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे हे पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर अनेक वर्षांपासून बेघरपणाचे दुर्लक्षित आयुष्य जगत आहे. संदर्भातील बातमी काही वृत्तपत्रांनी प्रसिध्द केली व मानवी हक्क विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या निदर्शनात हे वास्तव येताच त्यांनी आत्माराम याची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली.

त्यानंतर त्यांनी चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेंल्थ या मानसिक रुग्णांसाठी कार्यरत संस्थेचे अध्यक्ष रोनी जॉर्ज यांना आत्माराम साळवे याला मदत करावी, अशी विनंती केली आणि त्यांनी लगेच ती मान्य करून आत्मारामला पुनर्वसनाची संधी मदत म्हणून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

१० ऑगष्ट १९८६ हा दिवस आत्माराम साळवेचे आयुष्य बदलविणारा ठरला. रस्त्यावर फुगे व इतर खेळणे विकणाऱ्या आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे यांच्या नजरेसमोर माजी लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यावर खलिस्तानवादी अतिरेकी सुखदेव उर्फ सुखा आणि हरजिंदर सिंग उर्फ जिंदा यांनी मोटर सायकलवरून येऊन गोळीबार केला.

जनरल अरुण वैद्य त्यांच्या कारमधून क्वीन्स गार्डन येथील त्यांच्या निवासस्थानाकडे जात होते. जनरल वैद्य यांच्यावर तीन वेळा गोळीबार करून जिंदा व सुखा हे पळून जाण्यास यशस्वी ठरले. गोळीबार करताना आणि पळून जाताना जिंदा व सुखा यांना पाहणारे आत्माराम उर्फ आदिनाथ साळवे ह्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी महत्वाचे साक्षीदार ठरले.

आज ६५ वर्षीय आत्माराम साळवे मानसिक विकारांचा सामना करीत आहेत असेही काही जणांना जाणविले. आत्माराम हे उत्तम बासरी वादक आहेत. जेव्हा जिंदा व सुखा यांच्याविरुद्ध खटला सुरु होता तेव्हा आत्माराम साळवे यांना पोलीस संरक्षण होते. परंतु, दुर्दैवाने त्यांना आज कोणतेही संरक्षण नसून ते निर्वासित जीवन ते जगत आहेत.

चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थतर्फे सामाजिक-मानसिक पुनर्वसनासाठी (सायको-सोशल रिहॅबिलिटेशन) आत्माराम साळवे यांना महिती देऊन त्यांची जबाबदारी घेण्यात आल्याचे चैतन्य इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ समन्वयक राहुल शिरुरे यांनी दिली.

“आत्माराम साळवे यांच्या जीवनाला आजही खालीस्तानवादी अतिरेक्यांचा धोका असू शकतो. आपल्या देशात अन्यायग्रस्त (व्हिक्टीम) आणि साक्षीदार यांना संरक्षण देणारा कोणताही नीट कायदा आणि यंत्रणा नाही हे आत्माराम साळवे याच्या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. न्याय मिळावा व न्याय व्हावा यासाठी मदत करणाऱ्यांना संरक्षण देणारा कायदा असावा यासाठी नागरिकांनी मदत केली पाहिजे”, असे प्रतिक्रिया अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली.

पहा व्हिडीओ : अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्यांना रामदास कदमांनी दिली? 

 

Back to top button