कोल्हापूर : कोरे, शिवसेना शिंदे गटाचे सत्ताधार्‍यांना बळ | पुढारी

कोल्हापूर : कोरे, शिवसेना शिंदे गटाचे सत्ताधार्‍यांना बळ

कोल्हापूर; विकास कांबळे :  सत्ताधार्‍यांची एकजूट, विरोधकांचा विस्कळीतपणा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेले अपयश यामुळे सत्ताधार्‍यांना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ता कायम राखण्यात यश आले. व्यापारी गटात मात्र पुन्हा एकदा सत्ताधार्‍यांना अपयश आले आहे. या विजयामुळे जनसुराज्य शक्ती व शिवसेना शिंदे गटाच्या मदतीने महाविकास आघाडी भक्कम असल्याचे चित्र पहावयास मिळाले. आपापले गट राखण्याचा प्रयत्न नेत्यांनी केल्याचे ठळकपणे दिसते.

बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधार्‍यांचे प्रयत्न सुरू होते. सर्वसमावेशक एकच आघाडी करण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या. आ. पी. एन. पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे, खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, संजय घाटगे यांनी एकत्र येऊन राजर्षी शाहू शेतकरी आघाडी स्थापन केली. हे करत असताना त्यांना भाजप व शिवसेनेतील दोन्ही गटांतील पोटगटांना सोबत घेण्यात यश आले नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला व विरोधी आघाडी बांधण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी स्थापन केली. त्यामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाडिक गट, समरजितसिंह घाटगे, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील-सरूडकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, राहुल देसाई यांचा समावेश होता; परंतु 24 तासांतच या आघाडीत बिघाडी झाली आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पवार व देवणे आघाडीतून बाहेर पडले.

एवढेच नव्हे तर त्यांच्या गटाच्या उमेदवारानेही माघार घेतली. त्यामुळे या आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले. शिंदे गटासोबत आघाडी मान्य नसल्याचे देवणे व पवार यांनी सांगितले असले तरी ते पूर्ण सत्य नाही. हे गडहिंग्लज बाजार समितीच्या आघाडीवरून दिसून येते. याठिकाणी पूर्वीच्या शिवसेनेतील वाद कारणीभूत ठरला.

माघारीनंतर आठ दिवसदेखील प्रचाराला मिळाले नाही. त्यामुळे विरोधी आघाडीला मतदारांपर्यंत पोहोचता देखील आले नाही. राधानगरी, भुदरगड तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्ता विरोधी आघाडीकडे नव्हता. सत्तारूढ आघाडीकडे मात्र कार्यक्षेत्रातील सर्व नेते होते. ग्रामपंचायती, सेवा सोसायटी त्यांच्या ताब्यात असल्यामुळे बाजार समितीमधील सत्ता राखण्यात त्यांना यश आले.

सत्ताधार्‍यांच्या बाजूने विनय कोरे राहिल्यामुळे त्यांचे विधानसभेचे विरोधक ठाकरे गटाचे माजी आ. सत्यजित पाटील यांना विरोधी आघाडीचे नेतृत्व देण्यात आले. चंद्रदीप नरके यांच्याबाबतीतही असेच आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी आ. पी. एन. पाटील सत्तारूढ आघाडीचे नेते असल्यामुळे नरके विरोधी पॅनेलसोबत राहिले. हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांचा संघर्ष आता संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे मुश्रीफ ज्या पॅनेलमध्ये असतील त्या बाजूला घाटगे जाणे सध्या तरी शक्यच नाही. क्षीरसागर आघाडीत आल्यामुळेच देवणे व पवार आघाडीतून बाहेर पडले हे न समजण्याइतकी जनता खुळी नाही. राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्यांतील नेते आ. हसन मुश्रीफ, खा.संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, संजय घाटगे यांनी आपापल्या गटाच्या कार्यकर्त्यांसाठी उमेदवारीकरिता प्रयत्न केला.

Back to top button