श्रीगोंदा : समविचारींना सोबत घेऊन लढणार : राहुल जगताप | पुढारी

श्रीगोंदा : समविचारींना सोबत घेऊन लढणार : राहुल जगताप

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : समविचारी लोकांना एकत्र घेऊन शेतकरी विकास व हमीभाव या मुद्द्यावर श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचा निर्धार माजी आमदार राहुल जगताप यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
कृषी उत्पन्न बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहाटा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, काष्टीचे सरपंच साजन पाचपुते, मितेश नाहाटा उपस्थित होते.

राहुल जगताप म्हणाले, की तालुक्यातील शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव, शेतकरी विकासासाठी वेगवेगळ्या योजना आणून त्यांना नवसंजीवनी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. शेलार म्हणाले, की बाळासाहेब नाहाटा यांनी बाजार समितीचा राज्यात लौकिक केला आहे. विकासकामाच्या माध्यमातून बाजार समितीचा चेहरामोहरा बदलला आहे.

पक्षाचा संबंध नाही : नाहाटा
‘आपण या निवडणुकीत जगताप यांच्याबरोबर आहात, याची कल्पना विखे पाटील यांना दिली आहे का?’ या प्रश्नावर शेलार यांनी सांगितले, ही सहकारी संस्थांची निवडणूक आहे व ही निवडणूक पक्षविरहीत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध येत नाही. म्हणून जगताप यांच्यासोबत खंबीरपणे काम करणार आहे.

नागवडेंकडे पर्याय नव्हता : साजन पाचपुते
काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी मला मदत नसती केली, तर आमदार बबनराव पाचपुते यांना मदत केली असती काय़ कारण मला मदत करण्याशिवाय नागवडे यांच्याकडे पर्याय नव्हता, असे काष्टीचे सरपंच साजन पाचपुते यांनी सांगितले. जगताप यांच्यासोबत कसे? असे विचारल्यावर ते म्हणाले, की बाजार समितीसाठी नागवडे यांनी आमदार पाचपुते यांच्याशी युती केली आणि आमदार पाचपुते यांच्यावर माझा विश्वास नाही. मला उभे करून ते माझाच पराभव करतील. त्यामुळे मी जगताप यांच्यासोबत आहे.

Back to top button