Kiren Rijiju: 'तुकडे तुकडे गँगकडून भारतावर हल्ले'; किरेन रिजिजूंचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल
पुढारी ऑनलाईन: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेवर वक्तव्य केले आहे. भारतीय न्यायव्यवस्था स्वतंत्र असून, भारतीय न्यायव्यवस्थेला विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. भारतीय लोकशाहीवर कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळे लोकशाही आपल्या रक्तातच असल्याचे वक्तव्य कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी केले आहे. भारताविरोधी विदेशी शक्ती तुकडे तुकडे गँगच्या मदतीने भारतावर हल्ला करत असल्याचे वक्तव्य करत, राहुल गांधींसह विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. भुवनेश्वर येथील केंद्र सरकारच्या कायदा अधिकाऱ्यांच्या परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना कायदामंत्री रिजिजू म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने संपूर्ण नवजीवनाचा प्रवास सुरू केला असल्याचे तुकडे-तुकडे टोळीतील सदस्यांनी समजून घेतले पाहिजे. या टोळ्यांना भारतविरोधी विदेशी शक्तींची मदत मिळते. या शक्ती भारतीय लोकशाही, भारत सरकार, न्यायव्यवस्था, लष्कर, निवडणूक आयोग आणि तपास यंत्रणांसारख्या महत्त्वाच्या संस्थांवर सतत हल्ले करत आहेत, असेही कायदामंत्री म्हणाले.
भारतीय न्यायव्यवस्था अडचणीत असल्याचे देशातून आणि बाहेरून दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावरून भारतीय न्यायव्यवस्था आणि न्यायमूर्तींना चांगले-वाईट म्हटले जाणे दुर्दैवी आहे. सरकारबाबत अशा गोष्टी घडत असतील तर त्यांचे स्वागतच आहे, मात्र न्यायव्यवस्थेवर अशा प्रकारची टीका करणे योग्य लक्षण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
Indian Judiciary is independent. And Indian Judiciary can never be forced to play the roles of opposition Party. No body can even question Indian democracy because democracy runs in our blood.
A short clip of my remarks at Central Govt Law Officers Conference at Bhubaneswar pic.twitter.com/fSqrUo5qu4— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 4, 2023