कोल्हापूर : बनावट लग्न लावून पैसे उकळणारी राज्यव्यापी टोळी गजाआड | पुढारी

कोल्हापूर : बनावट लग्न लावून पैसे उकळणारी राज्यव्यापी टोळी गजाआड

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड येथील विवाहासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांचा बनावट वधुशी विवाह लावत त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांच्या राज्यव्यापी टोळीचा कुरुंदवाड पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी ५ माहिलांसह ९ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच फसवणूक झालेल्या तरुणांनी फिर्याद देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

संध्या विजय सुपणेकर (वय.४३, रा. माळवाडी. सांगली), ज्ञानबा रामचंद्र दवंड उर्फ संतोष ज्ञानदेव सुतार (४१,रा. मदनवाडी ता. इंदापूर) विश्वजीत बजरंग जाधव (२३), जगदीश बजरंग जाधव (२४), वर्षा बजरंग जाधव (४०, तिघे रा. सुलतानगादे ता. खानापूर), शारदा ज्ञानदा दवंड (२३ रा, नाशिक), दिपाली केतन बेलोरे (२१, हडपसर), रेखा गंगाधर कांबळे (३८, रा.अंबीका रोहिना) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

कुरुंदवाड येथील अविनाश दत्तात्रय घारे, विकास गणपती मोगणी या दोन युवकांशी लग्नाचा बनाव करून सोन्याचे दागिनेसह ४ लाख, ४० हजाराची फसवणूक केली. या प्रकरणी २३ डिसेंबर २०२२ रोजी ९ जणांच्या टोळीविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील, विजय घाटगे, सागर खाडे, अनिल चव्हाण यांनी सुलतानगादे, मदनवाडी, हडपसर पूणे, माळवाडी, भिलवडी, नाशिक, लातूरला पथक रवाना करून अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून टोळीतील संशयित आरोपींना अटक करत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button