Team India : भारताचे नशीब एका दिवसात बदलले, WTC फायनलचा मार्ग झाला सोपा! | पुढारी

Team India : भारताचे नशीब एका दिवसात बदलले, WTC फायनलचा मार्ग झाला सोपा!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाला (Team India) एकाच दिवसात आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला. एकप्रकारे टीम इंडियाचे नशीब एका दिवसात बदलले. रविवारी (दि. 18) चट्टोग्राम कसोटीत भारताने बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला. या दोन सामन्यांपूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर ऑस्ट्रेलियन संघ 76.92 गुणांच्या टक्केवारीसह अव्वल तर भारतीय संघ 55.77 गुणांच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (team india reached into top 2 of wtc points table after australia beat south africa)

रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत भारताने बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला आणि संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर गेला. तर याच दिवशी दुपारी ब्रिसबेन कसोटीत द. आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाचे तारे चमकले आणि एकाच दिवसात दोन स्थांनांची झेप घेत थेट दुसरे स्थान गाठले. दरम्यान, द. आफ्रिकेची 54.55 टक्के गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर श्रीलंका 53.33 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या आणि इंग्लंड 44.44 गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. संघ 42.42 गुणांच्या टक्केवारीसह सहाव्या क्रमांकावर आहे. (team india reached into top 2 of wtc points table after australia beat south africa)

इंग्लंड-पाकिस्तान मालिकेनंतर टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्धचा विजय आणि ऑस्ट्रेलियाचा द. आफ्रिकेवरचा विजय यामुळे आता भारतीय संघाला डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवणे सोपे झाले आहे. भारताला आता एकूण पाच कसोटी खेळायच्या आहेत. बांगलादेशविरुद्ध एक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. टीम इंडियाने पाचही सामने जिंकले तर ते फायनलसाठी सहज पात्र ठरतील.

दुसरीकडे, टीम इंडियाला सध्या सुरू ऑस्ट्रेलिया विरुद्ध द. आफ्रिका कसोटी मालिकेवरही अवलंबून राहावे लागणार आहे. द. आफ्रिका संघ सध्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन संघ ज्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे द. आफ्रिकेचा पुढचा मार्ग सोपा असणार नाही. जर ऑस्ट्रेलियाने द. आफ्रिकेला क्लीन स्वीप केले आणि भारताने पुढच्या पाचही कसोटी जिंकल्या तर अंतिम फेरी गाठणे सोपे होईल. मात्र, बांगला देशने पुढच्या सामन्यात टीम इंडिचा पराभव केल्यास आणि द. आफ्रिकेने एक-दोन कसोटी जिंकल्यास पुन्हा एकदा डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत बदल होऊन टीम इंडिया पुन्हा फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडू शकते. ऑस्ट्रेलियानंतर द. आफ्रिकेला त्यांच्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. (team india reached into top 2 of wtc points table after australia beat south africa)

त्यामुळे ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी दुसऱ्या स्थानासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात स्पर्धा आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जून 2023 मध्ये इंग्लंडमधील ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल.

Back to top button