लातूर : किल्लारी परिसराला भूकंपाचा धक्का, २९ वर्षापूर्वीच्या आठवणी झाल्या जाग्या | पुढारी

लातूर : किल्लारी परिसराला भूकंपाचा धक्का, २९ वर्षापूर्वीच्या आठवणी झाल्या जाग्या

लातूर ; पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्ह्यातील किल्लारी व परिसरातील गावांना येथे आज (शनिवार) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सोम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची नोंद 2.4 अशी झाली आहे. रात्री लोक गाढ झोपेत असताना दोन वाजण्याच्या सुमारास भूगर्भातून मोठा आवाज आला व जमीन हादरली. यामुळे किल्लारी, किल्लारी वाडी, यळवट, शिरसल, मंगरुळ जुने किल्लारी, एकोंडी गावातील नागरिक घराबाहेर आले.

घाबरून नागरिकांनी रात्र घराबाहेरच जागून काढली. दरम्यान या धक्क्याने जीवीत वा वित्तहानी झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. या भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसरात असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळवले आहे. 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारीत भूकंप झाला होता. शनिवारच्या सौम्य धक्क्याने येथील नागरिकांच्या मनात 29 वर्षापूर्वी तेथे झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्या आठवणी जाग्‍या झाल्‍या.

हेही वाचा :  

Back to top button