कोल्हापूर : कृष्णा नदीतून कर्नाटक राज्यात ५ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग; ग्रामस्थांमध्‍ये महापुराची भीती | पुढारी

कोल्हापूर : कृष्णा नदीतून कर्नाटक राज्यात ५ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग; ग्रामस्थांमध्‍ये महापुराची भीती

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा: कृष्णा नदी क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ होऊन २९ फूट तीन इंच पाणी पातळी झाली आहे.  राधानगरी धरण क्षेत्रात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने एक फुटाने पाणी पातळी कमी होऊन ३२ फूट सात इंच इतकी पाणी पातळी झाली आहे.

आज सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजापूर बंधाऱ्यातून ५ हजाराने क्‍युसेक विसर्ग वाढला असून, ७० हजार क्‍युसेक पाण्याचा कर्नाटक राज्यात विसर्ग सुरू आहे. दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाल्यास बॅक वॉटरमुळे कुरुंदवाड दरम्यानचा शिरढोण पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगा नदीक्षत्रात पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने पाणी पातळीत ५ ते ६ इंचाने घट होत आहे. कृष्णा नदी क्षेत्रात पावसाने सातत्य ठेवल्याने दररोज रात्रीतून फुटाने वाढ होऊन ५ हजाराने पाण्याच्या विसर्गात वाढ होत आहे. आज सकाळी ८ वाजता कृष्णा पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यांची पाणी पातळीची पुढील प्रमाणे- तेरवाड बंधारा ५१ फूट ६ इंच, शिरोळ बंधारा ४२ फूट, यादव पूल ४० फूट तर कृष्णा नदी राजापूर बंधारा २९ फूट ३ इंच झाली आहे.

खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, अकीवाट, कुरुंदवाड, शिरढोण, परिसरातील ग्रामस्थातून वाढत असलेल्या पाण्याचा विसर्ग आणि पाणी पातळीमुळे महापुराची चर्चा होत असून धास्ती निर्माण झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button