ऋषी कपूर यांचे कोल्हापूरशी काय आहे नाते?
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन
भारतीय चित्रपट आणि कपूर घराणे यांचे नाते अगदी चिरंतन आहे. कारण, या घराण्याच्या चार पिढ्या याच क्षेत्रात कार्यरत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणार्या कपूर घराण्याचे आणि कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या घराण्याच्या तिसर्या पिढीतील चतुरस्र अभिनेते ऋषी कपूर यांचे कोल्हापूरशी अनोखे नाते होते.
‘प्रेमग्रंथ’ आणि ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ते दोन वेळा कोल्हापूरला आले होते. उंच, बांधेसुद शरीरयष्टी, चेहर्यावर लाली असलेल्या लाडक्या ऋषीला पाहायला कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती. ऋषी कपूर यांनाही येथील हवामान, खानपान अन् कोल्हापूरची भुरळ पडली होती. कोल्हापूर आणि कपूर घराण्याचे नाते खूपच जूने. राज कपूर यांच्या कारकिर्दीची सुरुवात इथेच झाली. त्यामुळे कपूर घराण्याने कोल्हापूरवर नेहमीच भरभरून प्रेम केले. याच प्रेमापोटी १९९६ साली ‘प्रेमग्रंथ’ या चित्रपटाची निर्मिती करताना येथील पन्हाळा, मसाई परिसरात चित्रीकरणाचा आग्रह कपूर घराण्यातील सदस्यांनी धरला होता आणि त्यानुसार येथे चित्रीकरणही पूर्ण झाले. त्यावेळी ऋषी कपूर यांच्यासोबत ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर आणि राजीव कपूरही कोल्हापूरला आले होते.
अभिनेत्री माधुरी दीक्षितही होती. पन्हाळा, मसाई पठार, काळम्मावाडी, पंचगंगा नदी घाट परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. साधारणतः ८ ते १० दिवस हे सर्व कोल्हापुरातील हॉटेल शालिनी पॅलेस येथे मुक्कामी होते. तत्पूर्वी, १९७७ साली ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ऋषी कपूर आणि मौसमी चॅटर्जी, तसेच अमजद खान, अशोककुमारही कोल्हापूरला आले होते. त्यावेळी हळदीजवळील कांडगावात चित्रीकरण झाले होते.
कपूर घराणे आणि कोल्हापूर….
राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हेदेखील चित्रीकरणासाठी कोल्हापूरला येत असत. त्यांच्या सोबत राज कपूरही येत. चाळीसच्या दशकात पृथ्वीराज कपूर यांचा मुक्कामच सहकुटुंब कोल्हापुरात होता. ‘वाल्मीकी’, ‘महारथी कर्ण’ आदी चित्रपटांची निर्मिती भालजींनी या काळात केली होती. त्यावेळी लहान असणार्या राज कपूर यांच्यासह शशी कपूर यांच्या आठवणी आजही येथील ज्येष्ठ सांगतात. राज कपूर यांच्या चेहर्याला पहिल्यांदा रंग लावला गेला तो इथेच. येथील जयप्रभा स्टुडिओत ‘वाल्मीकी’ चित्रपटाचे चित्रीकरण होते. चित्रपटातील नारदमुनींची भूमिका चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना दिली होती आणि त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात येथे झाली. या भूमिकेसाठी मिळालेल्या पाच हजार रुपयांच्या मानधनातून त्यांनी आर. के. स्टुडिओसाठी चेंबूर येथे जागा खरेदी केली.
महापालिकेत शिपाई म्हणून काम करणारे (कै.) संभाजी पाटील राज कपूर यांचे चाहते होते. त्यांनीच पुढाकार घेऊन वाशी नाका येथे राज कपूर यांचा पुतळा उभारला असून, आजही पाटील कुटुंबीय व राज कपूर यांचे चाहते या पुतळ्याची देखभाल करतात. या पुतळ्याच्या अनावरणासाठी शशी कपूर स्वतः आले होते. पृथ्वीराज कपूर, त्यानंतर राज कपूर यांच्यावर कोल्हापूरकरांनी केलेल्या प्रेमाखातर शशी कपूर, रणधीर कपूर, करिश्मा कपूर यांनी कोल्हापूरला आल्यानंतर आवर्जून राज कपूर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणास भेट दिली आहे. त्यांनी कोल्हापूरशी नेहमीच प्रेमाचे नाते जपले.