'पवित्र रिश्ता'ची १२ वर्षे, अंकिता म्हणते.. (Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीवरील लोकप्रिय ठरलेली ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेला १२ वर्षे पूर्ण झाले आहेत. या मलिकेतील अर्चना म्हणजेच अंकिता लोखंडे आणि मानव म्हणजेच सुशांत सिंह राजपूत यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. सुशांत या जगात नाही. तरीही चाहत्यांना अर्चना आणि मानवची जोडी आजही आवडते. या दोघांनाही या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आता ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सुशांतने २००९ ते २०११ पर्यंत पवित्र रिश्ता मालिकेत काम केले होते. या मालिकेच्या सेटवर सुशांत आणि अंकिता हे रिअल लाईफमध्येही एकमेकांच्या प्रेमात पडले. दीर्घकाळ दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. पुढे २०१६ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. मानव-अर्चनाच्या या ‘पवित्र रिश्ता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने अंकिताने सुशांतच्या आठवणीत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला असून इन्स्टाग्रामवर लाईव्ह दरम्यान अंकित लोखंडे म्हणाली, ‘सुशांत आता आपल्यात नसल्याने त्याच्याशिवाय ‘पवित्र रिश्ता’ हा अपूर्ण आहे. अर्चनाचा मानव फक्त सुशांतच होता. मला विश्वास आहे, तो आता जिथे कुठे असेल तो तिथून मला पाहत असेल. सुशांतने मला अभिनय शिकवला. मी ज्यूनियर होते, तो माझ्यापेक्षा सिनियर होता आणि तो एक हूशार कलाकार होता. त्याच्यासोबत काम करताना मी स्वतःला खूप नशिबवान समजत होते.’
१४ जून २०२० रोजी सुशांत सिह राजपूतने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्याची कथित गर्लफ्रेंड, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. याचबरोबर, सुशांतचे मित्र आणि संबंधित मंडळींची चौकशी करण्यात आली. या प्रकरणी रियाविरोधात सुशांतच्या वडिलांनी तक्रार दिली होती. सुशांतच्या आत्महत्याची चौकशी करत असताना ड्रग्जप्रकरण समोर आले. या प्रकरणात रियाला ‘एनसीबी’ने ताब्यात घेतलं होतं. पण, रियाला जामीन मिळाल्यानंतर तिची सुटका झाली. सुशांतची आत्महत्या की हत्या याबाबत अजूनही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.