‘कौन है आदित्यानाथ वह गंजा आदमी’ असे म्हणणारे आता अयोध्येला निघालेत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला | पुढारी

'कौन है आदित्यानाथ वह गंजा आदमी' असे म्हणणारे आता अयोध्येला निघालेत; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : “कौन है आदित्यानाथ वह गंजा आदमी, भगवे कपडे पहनता है असे म्हणणारे आता अयोध्येला चाललेत” अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे. कोणाच्या वाढदिवसाला भैया नावाचा केक कोण कापत होते? असा सवालही त्यांनी यावेळी केला.

हनुमान चालिसावरुन तापलेल्या राजकारणावर बोलत असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मनसे प्रमुख राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यानंतर आयोध्येला जाणार आहेत. युपीतील योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरील भोंगे उतरविल्यानंतर त्यांचे अभिनंदन राज ठाकरे यांनी केले आहे. यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्ववादावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर राऊत यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे.

पुढे ते असंही म्हणाले की, महाराष्ट्रातले राजकारण काही राजकीय नेते खराब करण्याचे प्रयत्न करत आहेत. सरकारला अस्थिर करण्याचे काम ते करत आहेत. पाठीमागचे वार आमच्यात चालत नाहीत. राज्यात महाराष्ट्राचे नाव बदनाम करण़्याचा कट चालू आहे. या कटाला प्रत्युत्तर देणं गरजेच आहे. शिवसेना समोरून छातीवर वार करणारा पक्ष आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बोलत नाही. आमची हत्यारे आमचीच आहेत, आणि ती धारधार आहेत, दोन घाव बसले तर पाणी मागणार नाही, असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

भाजपचे केंद्रीय मंत्री अश्विनकुमार चौबे यांनी हनुमान चालीसा पठण करणाऱ्यांना तुम्ही जर तुरूंगात टाकत आहात जर आता बाळासाहेब असते तर त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं असतं. या त्यांच्या वक्तव्याचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. यावर ते म्हणाले की, हनुमान चालीसावरून दंगे घडवून देशाचे विभाजन करण्याचा ज्यांचा डाव आहे त्यांच्याविरोधात शिवसेना लढत आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी यावर फुलेच उधळली असती. त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांची चिंता करू नका.

ते पुढे म्हणाले की, योगींनी हनुमानाविषयीचे जे अनुद्गार काढले ते हनुमानाची अवहेलना करणारे आहेत असा आरोपही त्यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केला. योगींचे अनुद्गार चौबेंनी वाचावे असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. हिंदुत्वाचा अपमान झाल्याने शिवसेना युतीतून बाहेर पडल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपच्या राजकीय रणनीतीवर बोलत असताना ते म्हणाले की, आम्हाला लढण्याचे प्रशिक्षण देण्याची काहीच गरज नाही. भाडोत्री लोक आणण्याची आम्हाला काहीच गरज नाही. शिवसेना या सर्वांना चांगलेच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

हेही वाचलंत का? 

.

Back to top button