Sri Lanka vs India 3rd T20 : श्रीलंकेकडून भारत १३ वर्षानंतर मालिका हरला | पुढारी

Sri Lanka vs India 3rd T20 : श्रीलंकेकडून भारत १३ वर्षानंतर मालिका हरला

कोलंबो : पुढारी ऑनलाईन

भारत आणि श्रीलंका ( Sri Lanka vs India 3rd T20 ) यांच्यातील तिसरा टी२० सामना ७ गडी राखून जिंकत श्रीलंकेने मालिका २ – १ अशी जिंकली. भारताचे ८२ धावांचे माफक आव्हान श्रीलंकेने ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १४.३ षटकात पार केले. लंकेकडून धनंजया डि सिल्वाने नाबाद २३ धावांची खेळी केली. भारताकडून राहुल चाहरने चांगला मारा करत ४ षटकात १५ धावा देत ३ विकेट घेतल्या. भारताने श्रीलंकेविरुद्धची आंतरराष्ट्रीय मालिका तब्बल १३ वर्षांनंतर गमावली.  श्रीलंकेना भारताला पहिल्यांदाच टी२० मालिकेत मात दिली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला ८ फलंदाजांच्या मोबदल्यात २० षटकात फक्त ८१ धावा करता आल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक २३ धावा केल्या. श्रीलंकेकडून हसरंगाने भेदक मारा करत भारताचे ९ धावा देत ४ फलंदाज बाद केले.

भारत आणि श्रीलंका ( Sri Lanka vs India 3rd T20 ) यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने श्रीलंकेसमेर ८२ धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान पार करताना श्रीलंकेने सावध सुरुवात केली. सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी ५ षटकात २२ धावांपर्यंत मजल मारली.

पण, राहुल चाहरने सहाव्या षटकात १२ धावा करणाऱ्या फर्नांडोला बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर चाहरने आठव्या षटकात मिनोद भानुकालाही ( १८ ) बाद करत श्रीलंकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

पाठोपाठ दोन विकेट पडल्याने श्रीलंकेची धावगतीही मंदवली. लंकेला १० षटकात ४२ धावांपर्यंत मजल मारता आली. धनंजया डि सिल्वा आणि समरविक्रमा यांनी सावध फलंदाजी करण्याची रणनिती अवलंबली. या दोघांनी १२ व्या षटकात श्रीलंकेचे अर्धशतक धावफलकावर लावले.

ही जोडी श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवणार असे वाटत असतानाचा राहुल चाहरने समरविक्रमाला ६ धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर धनंजया डि सिल्वा आणि हसरंगा यांनी लंकेची आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी १५ व्या षटकात ८२ धावांचे आव्हान पार करुन मालिका २ – १ अशी खिशात टाकली.

भारताची ढिसाळ फलंदाजी ( Sri Lanka vs India 3rd T20 )

तत्पूर्वी, भारत आणि श्रीलंका ( Sri Lanka vs India 3rd T20 ) यांच्यातील तिसरा आणि निर्णायक टी२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चांगलाच अंगलट आला. सामन्याच्या पहिल्याच षटकात कर्णधार शिखर धवन शुन्यावर बाद झाला.

शिखर बाद झाल्यानंतर आलेल्या देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताला चांगली सुरुवात करुन देण्याच्या इराद्याने फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र पडिक्कल ९ धावा मेंडीसच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर आलेला संजू सॅमसनही शुन्यावर पायतीत झाला. त्याला हसरंगाने बाद केले.

भारताची ही गळती इथेच थांबली नाही. सॅमसन नंतर गायकवाडही  ( १४ ) हसरंगाच्या फिरकीत अडकला आणि पायचित झाला. यामुळे भारताची अवस्था २ बाद २३ वरुन ४ बाद २४ अशी झाली. पायचीतच्या चक्रव्ह्युवात अडकेलेल्या भारताला सावरण्यासाठी अनुभवी भुवनेश्वर कुमार क्रीजवर आला.

त्याने आणि नितीश राणाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सावध फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र श्रीलंकेचा कर्णधार शनकाने नितीश राणाला ६ धावांवर बाद करत भारताला पाचवा धक्का दिला.

भारताचा निम्मा संघ माघारी गेल्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादव या अनुभवी जोडीने भारताला १४ व्या षटकात अर्धशतकाच्या पार पोहचवले. पण, हसरंगाने १६ धावा करुन एकाकी किल्ला लढवणाऱ्या भुवनेश्वरला बाद केले.

भुवनेश्वर बाद झाल्यानंतर कुलदीप यादवने डावाची सूत्रे हातात घेतली. त्याने संयमी फलंदाजी करत भारताला २० षटकात ८ बाद ८१ धावांपर्यंत मजल मारून दिली. त्याने नाबाद २३ धावांची खेळी केली.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : कोरोनाचा आदिमानवाशी काय संबंध आहे?

Back to top button