रत्नागिरी : अंतिम टप्प्यातील आंबा व्यवसायही अडचणीत | पुढारी

रत्नागिरी : अंतिम टप्प्यातील आंबा व्यवसायही अडचणीत

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तापमान 32 अंश सेल्सीअसवर पोहोचले आहे. कडकडीत उन्हामुळे नागरिक त्रस्त असताना आरोग्याच्या समस्याही वाढत आहे. या वातावरणाचा परिणाम हापूसवर झाला असून त्यात साका होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला आंबा व्यवसाय अंतिम टप्प्यातही आणखीनच अडचणीचा ठरत आहे.

हवामान खात्याने उष्णलहरींनी तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचा प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यात दिसत आहे. शनिवारपासून पारा 32 अंश पार करुन वर सरकू लागला आहे. दिवसा कडकडीत उन्हासह उष्म्यांच्या झळांनी जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत. तिच
परिस्थिती रात्रीच्यावेळीही आहे. त्यामुळे आंबा हंगामाचा महत्वाचा महिना असलेला मे यंदा हंगामाचा शेवटचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्या नंतर पुन्हा उष्मा वाढला. सकाळी 11 वाजल्यानंतर नागरिकांना उन्हाची झळाळी सहन करावी लागत आहे. ही उष्णतेची लाट अजून राहणार असून कोकणातील पालघर जिल्ह्यात त्याचा प्रभाव सर्वाधिक राहणार आहे. बाष्पीभवनाचा वेघ वाढला असल्याने उष्ण लहरींचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातही जाणवणार आहे.
दरम्यान, ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कोकणातील हापूसचा हंगाम जवळपास आटोपता झाला आहे. प्रतिकूल वातावरणाचा फटका आंब्यासह काजू कोकमाला बसला आहे.

Back to top button