‘तुकाई चारी’ पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह | पुढारी

'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह

कर्जत : प्रतिनिधी
गावांसाठी वरदान ठरणारी ‘तुकाई चारी’ होण्यासाठी कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील वयोवृध्द सामाजीक कार्यकर्ते बाळासाहेब त्रिंबक सुर्यवंशी (वय ७५ वर्षे )यांचे दहा महिन्यांपासून कर्जत तहसील कार्यालया समोर सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. ही योजनेच मान्यता मिळत नाही तो पर्यंत घरी येणार नाही अशी भिष्म प्रतिज्ञा करणा-या या आधुनिक भगिरथाने गावाच्या शिवेमध्ये माघील दहा महिन्या पासून प्रवेश केलेला नाही मात्र श्री सुर्यवंशी यांच्या आंदोलनाची दखल शासन कधी घेणार असा प्रश्न परीसरातील शेतकरी विचारू लागले आहेत. सुर्यवंशी यांनी आता करो या मरो चा नारा दिला असून, आता ‘मृत्यू येईपर्यंत माघार नाही ’असा निर्धार बोलताणा ते व्यक्त करीत आहेत. 

तुकाईचारीसाठी बाळासाहेब सुर्यवंशी हे अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. योजनेची सर्व कागदपत्रे त्यांचेकडे आहेत. या योजनेची माहिती आणि पाटबंधारे विभागाचे पत्रव्यवहार याने एक पिशवी भरली आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर श्री सुर्यवंशी यांनी कर्जत तहसील कार्यालया समोर ५ मार्च २०१७ पासून आंदोलन सुरू केले आहे. ते रोज सकाळी तहसील कार्यालयाच्या आवरामध्ये येऊन बसतात आणि कार्यालय बंद झाल्यांतर निघून जातात. मात्र रात्री ते स्वत:च्या घरी जात नाहीत किंवा गावाच्या वेशीमध्ये जात नाहीत. या दहा महिन्यामध्ये दसरा, दिवाळी सह अनेक सण झाले मात्र श्री सुर्यवंशी स्वताहाच्या घरी गेलेले नाहीत. ही २१ गावे हेच माझे घर आहे आणि या गावातील सर्व शेतकरी माझे कुटुंब आहे त्यांना पाणी देणे हे माझे कर्तव्य आहे आणि यामुळे ही योजना होण्यासाठी  शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणार असे सूर्यवंशी सांगतात.

एकवीस गावांना मिळणार संजीवनी 
कर्जत तालुक्यातील मिरजगांव परीसरातील २१ गावांना कूकडी सिंचन प्रकल्पा मधून दीड टीएमसी पाणी देण्यास मान्यता आहे. मात्र, पाटबंधारे खात्याचे राज्याचे सचिव यांनी हे पाणी देण्यास खोडा घातला आहे. वास्तवीक पहाता कुकडी प्रकल्पामध्ये तुकाई चारीचा समावेश राज्यामध्ये सन ९५ साली युतीचे सरकार असताना करण्यात आला होता. त्यावेळी या योजनेचा सर्वे करण्याच्या सुचना तत्कालीन पाटबंधारे मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिल्या होत्या मात्र पुढे काहीच झाले नाही. नंतर राज्यात १५ वर्षे अघाडीचे सरकार सत्तेवर होते व हा प्रश्न त्यांनी तसाच भिजत पडला आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पण निवडणुकीमध्ये ताकाईचारी निवडून आल्यावर एक महिन्यात करू असे अश्वासन दिले होते मात्र अद्याप तुकाईचारीचा प्रश्न सुटलेला नाही.  

मुख्यमंत्री यांना पत्र 
बाळासाहेब सुर्यवंशी यांनी या प्रश्नासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस याना 9 फेबु्रवारी रोजी पत्र लिहले आहे यामध्ये त्यांनी म्हणटले आहे की, कर्जत तालुक्यातील मिरजगांव परीसरातील 21 गावे हे कायम स्वरूपी टंचाई ग्रस्त , आवर्षण प्रवन व दुष्काळी आहेत. या गावातील शेतक-यांच्या दृष्टिने तुकाई चारी हा जिवन मरणाचा प्रश्न आहे. पाण्याची व्यवस्था नसल्याने या गावामंधील शेती उध्वस्त झाली आहे. तुकाई चारी व्हावी या साठी मी आज पर्यंत अनेक वेळा आंदोलने केली आहेत. जिल्हयाचे पालकमंत्री यांनी तकाई चारी होईल, असे अश्वासन दिले आहे. तर तुकाई का होत नाही?
पाटबंधारे विभागाने या पूर्वी कुकडी प्रकल्पात पाणी शिल्लक नाही असे लेखी पत्र दिले होते यांनतर मी २१ गावांसाठी दीड टीएमसी पाणी कसे देता येईल हे लेखी कळवले होते. यावर पुन्हा कुकडी विभागाने पत्र दिले की, तीन टीएमसी पाणी शिल्लक आहे मात्र आंध्रप्रदेश महाराष्ट्र व कर्नाटक लवाद चालू असल्याने त्याचा निर्णय झाल्यावर पाण्याचे नियोजन करता येईल असे कळवले आहे.यांनतर तेलंगना या राज्याची पाणी मागणी याचीका फेटाळली आहे त्यामुळे आमच्या हक्काचे दिड टिएमसी पाणी त्वरीत देण्यात यावे व चारीचे काम सुरू करावे अशी मागणी श्री सुर्यवंशी यांनी केली आहे श्री सुर्यवंशी यांचे आंदोलनास परीसरातील सर्व शेतकरी यांचे सह तालुक्यातील विविध संघटना व राजकीय पक्षानी पाठीबा दिला आहे. 

पालकमंत्री यांनी घेतली भेट
जिल्हयाचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे निष्टावंत अशी ओळख असलेले प्रा. राम शिंदे यांनी १४ सप्टेबंर रोजी बाळासाहेब सूर्यवंशी यांची आंदोलनाच्या ठिकाणी येऊन भेट घेतली होती. या वेळी या प्रश्नावर कोणताच तोडगा निघाला नाही. श्री. शिंदे यांनी मी प्रयत्न करतो आपण आंदोलन थांबावे, असे आवाहन केले होते. 
 

Back to top button