जागतिक दिव्यांग दिवस : यांच्या इच्छाशक्ती पुढे नभही ठेंगणे !
पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेकदा आपण लहान सहान गोष्टीमध्ये तक्रारीचा सुर काढत असतो. परिस्थिती बऱ्याच अशी अनुकूल असतानाही त्याबाबत नाराजीच व्यक्त केली जाते. पण आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तींविषयी सांगणार आहोत. ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केलीच. पण इतरांना प्रेरणा मिळेल असं काम केलं आहे. आज आहे जागतिक दिव्यांग दिवस. खरं तर दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोण आजवर केवळ सहानुभूतीचाच राहिला आहे. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन दिव्यांग व्यक्तींनी सहानुभूतीच्या नजरांचं रूपांतर कौतुकात होईल असे अनेक विक्रम केले आहेत. त्यापैकीच आहेत पॅराऑलिंपिक खेळाडू ज्यांनी जगभरातील दिव्यांग खेळाडूंवर विजय मिळवत भारतासाठी गोल्ड मेडल आणलं.
पाहुयात कोण कोण आहेत हे खेळाडू :
मुरलीकांत पेटकर (1972) : पॅराऑलिंपिकमध्ये देशासाठी पहिलं वहिल आणि ते ही गोल्ड मेडल मिळवण्याचा मानही एका मराठमोळ्या माणसाकडे आहे. मुरलीकांत पेटकर यांनी हेडलबर्ग येथे पार पडलेल्या पॅराऑलिंपिक स्पर्धांमध्ये 50 मी फ्री स्टाईल स्विमिंग प्रकारात गोल्ड मेडल मिळवलं होतं.
देवेंद्र झांजरिया (2016 ) : भारतासाठी एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा गोल्ड मेडल जिंकणारे ऑलिम्पियन म्हणजे देवेंद्र झांजरिया. भालाफेक या क्रीडाप्रकारात पारंगत असलेल्या देवेंद्र यांनी 2004 च्या समर पॅराऑलिंपिकमध्ये आणि 2016 च्या रिओ पॅराऑलिंपिकमध्ये गोल्ड मेडल आपल्या नावावर केलं आहे.
मारियप्पन थंगवेलू ( 2016 ) : रिओ ऑलिंपिकमध्ये पदकांचं खातं मारियप्पन यांनी उंच उडी या क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल मिळवलं. आहे. या प्रकारात पदक मिळवणारे ते दुसरे भारतीय आहेत.
दीपा मालिक (2016) : देशासाठी मेडल मिळवणाऱ्या पहिल्या महिला पॅरा अॅथलीट म्हणून दीपा मलिक यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. 2016च्या रिओ ऑलिंपिकमध्ये त्यांनी सिल्व्हर मेडल आपल्या नावावर केलं.
अवनी लाखेरा (2021) : टोकियो पॅराऑलिंपिक मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल शूटिंग प्रकारात तिने गोल्ड मेडल मिळवलं. यामध्ये 2 मेडल मिळवणारी ती पहिली महिला पॅराऑलिंपियन ठरली तर गोल्ड मेडल मिळवणारी पहिली महिला पॅराऑलिंपियन ठरली.
कृष्ण नागर (2021): बॅडमिंटन मेन सिंगलमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूमध्ये कृष्ण नागर याचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल.
1968मध्ये तेल अवीव, इस्राएल येथे झालेल्या पॅराऑलिंपिकमध्ये भारताने पहिल्यांदाच सहभाग नोंदवला. यानंतर पॅराऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्यासाठी भारताला जवळपास 12 वर्षं वाट पाहावी लागली होती.