भारतीय महिलांची इतिहासात प्रथमच टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये एन्ट्री!
सिडनी : पुढारी ऑनलाईन
भारतीय महिलांची इतिहासात प्रथमच टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. साखळी फेरीत अपराजित राहिलेला भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज (ता.०५) पहिल्या सेमीफायनलमध्ये पावसाचा खेळ झाल्याने नाणेफेकही झाली नाही. त्यामुळे गुणांच्या जोरावर साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
भारताने आजपर्यंत झालेल्या सात स्पर्धांमध्ये एकदाही फायनलमध्ये प्रवेश केला नव्हता. मात्र, शानदार प्रदर्शनामुळे टीम इंडियाला यंदाचा विजयाचा प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. साखळी सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलिया, बांगला देश, न्यूझीलंड आणि श्रीलंकेला पराभूत करून आठ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. दरम्यान, दुसऱ्या सेमी फायनलच्या सामन्यातही पावसाने घोळ केल्यास यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये दाखल होतील.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने घात केला आहे. त्यामुळे सेमीफायनलच्या दोन्ही सामन्यांवर पावसाचे संकट घोंगावत आहे. त्यामधील पहिला सामन्यात पावसाचा खेळ झाल्याने भारताला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्याची मागणी केली होती. स्पर्धा सुरू असताना राखीव दिवसाचा निर्णय घेता येणार नाही, असे सांगत आयसीसीने ऑस्ट्रेलियाची मागणी फेटाळून लावली आहे.