केंद्रशासित प्रदेश असणारे दीवही गेल्या काही वर्षांपासून दररोज शंभर टक्के सौरऊर्जेवर चालत आहे. गेल्या सात वर्षांपासून या शहराला दिवसा सौरऊर्जा पुरवली जात आहे. सुमारे दोन सौर उद्याने आणि 112 सरकारी संस्थांच्या छतांवरील सौर प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज संपूर्ण शहराच्या दिवसातील ऊर्जेची गरज भागवत आहे. आज या 42 चौरस किलोमीटरच्या शहरात सुमारे 7 मेगावॅटची मागणी आहे. सर्व घरे, वातानुकूलित रिसॉर्टस्, 60 बेडचे हॉस्पिटल, एअर कंडिशन असलेली सर्व सरकारी, बिगर सरकारी कार्यालये, आईस्क्रीम कारखाने, फिश वेअरहाऊस हे सगळे दीवमध्ये दिवसभर सौरऊर्जेवर चालतात. प्रत्यक्षात सौरऊर्जेवर गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चा होत आहे. मात्र, देशातील बहुतांश भागात आणि नागरिक अजूनही सौरऊर्जेच्या व्यापक वापराचे आकलन करताना दिसून येत नाही. आता किरकोळ स्वरूपात कोठे सरकारी कार्यालयाच्या गच्चीवर, तर कोठे एखाद्या बंगल्यावर सोलर पॅनेल दिसतात; मात्र काळानुसार सौरऊर्जेतून वीज क्षेत्रात क्रांती घडवून आणता येणे शक्य आहे. यासाठी सांचीचे उदाहरण घेता येईल. सांचीचा आदर्श घेत देशातील अन्य भागांचे, शहराचे चित्र बदलेल अशी आशा व्यक्त करता येईल. सध्याच्या काळात हवामान बदलाशी सामना करताना अनेक देशांबरोसह भारतानेही कोळसा, तेल यासारख्या पारंपरिक इंधनांचा वापर करणे कमी केले आहे आणि तसा संकल्पही केला आहे. अर्थात, हा संकल्प तडीस नेण्यासाठी सौरऊर्जेचा वापर, हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.