जुन्या धरणांच्या सुरक्षेची चिंता | पुढारी

जुन्या धरणांच्या सुरक्षेची चिंता

कालबाह्य झालेल्या आणि होत चाललेल्या धरणांवर संयुक्त राष्ट्राने अहवाल तयार केला असून, तो भारतासाठी महत्त्वाचा आहे. यानुसार भारतात सध्या 4 हजार 407 मोठी धरणे असून, त्यापैकी 1 हजार 115 धरणे 2025 पर्यंत 50 वर्षांचा टप्पा पार करतील. यापैकी काही धरणांचे आयुर्मान 100 वर्षे असणार आहे. त्याचबरोबर 2050 पर्यंत देशातील 5 हजार 250 धरणे 50 वर्षे पूर्ण करणार आहेत. या धरणांच्या डागडुजीबाबत सूचना देत, अहवालात त्यांची नियमित तपासणी आणि निरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
देशातील बहुतांश भागात धरणांतील पाणीसाठा कमी झाला असून, परिणामी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अलीकडेच संयुक्त राष्ट्राने जगभरातील विविध देशांत असलेल्या जुन्या धरणांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. एका सर्वेक्षणात, जगभरातील हजारो धरणांचे वय संपल्याचे निदर्शनास आले आहे. साधारणपणे धरणे ही 50 ते 100 वर्षांसाठीच बांधली जातात. सध्या अनेक धरणांनी वयोमर्यादा गाठली, तर काहींनी ओलांडली आहे. भारतदेखील यास अपवाद नाही. जगभरात जीर्ण होणार्‍या धरणांवर संयुक्त राष्ट्राने अहवाल तयार केला असून, त्याचे नाव ‘एजिंग वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर : अ‍ॅन इमर्जिंग ग्लोबल रिस्क’ असे आहे. म्हणजेच या अहवालात धरणांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र खराब, जीर्ण होत असलेल्या मोठ्या धरणांचे पाडकाम करायचे असेल, तर पाणी साठ्याची पर्यायी व्यवस्था काय आहे? हादेखील कळीचा प्रश्न आहे.
तूर्त ‘इन्स्टिट्यूट फॉर वॉटर, एन्व्हॉयरमेंट अँड हेल्थ’च्या माध्यमातून जारी केलेल्या अहवालात म्हटले  की, 2050 पर्यंत बहुतांश लोकसंख्या ही मोठ्या धरणांच्या पायथ्याशी वास्तव्य करत असेल. पैकी बहुतांश धरणांनी वय पूर्ण केलेले असेल. साहजिकच, ही धरणे फुटण्याचा धोका आपल्या डोक्यावर कायमच राहणार आहे. प्रश्न केवळ 50-100 धरणांपुरता मर्यादित नाही. संपूर्ण जगात एकूण 58 हजार 700 धरणे असून, त्यापैकी बहुतांश धरणे ही 1930 ते 1970 या काळात बांधलेली आहेत. बांधकाम करताना त्यांचे वय 50 ते 100 वर्षे असेच गृहीत धरले आहे. 50 वर्षांनंतर काळाच्या ओघात सिमेंटपासून बांधलेली मोठी धरणे जीर्ण होऊ लागतात. आजघडीला जगभरातील एकूण धरणांपैकी 55 टक्के धरणे ही केवळ चार आशियाई देशांत आहेत. चीन, भारत, जपान आणि दक्षिण कोरिया. या देशांत बांधलेल्या धरणांपैकी बहुतांश धरणे 50 वर्षे पूर्ण करण्याच्या काठावर आहेत. एकट्या चीनमध्येच 23 हजार 811 धरणे असून, ही संख्या जगातील एकूण धरणांच्या 40 टक्के आहे.
कालबाह्य झालेल्या आणि होत चाललेल्या धरणांवर संयुक्त राष्ट्राने अहवाल तयार केला असून, तो भारतासाठी महत्त्वाचा आहे कारण आपण गरजेनुसार अजूनही जलसाठा करण्याची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. सध्याच्या स्थितीचे आकलन केल्यास, दरवर्षी पडणारा पाऊस आणि हिमवृष्टी पाहता, निसर्गातून मिळणार्‍या 4 हजार अब्ज घनमीटर पाण्यापैकी आपण केवळ 257 अब्ज घनमीटर एवढाच साठा करू शकतो आणि या मर्यादित स्वरूपातील पाण्याला धरणात साठविले जाते. यापैकी बहुतांश धरणांनी आपले वय ओलांडले असून, काही धरणे ती वयोमर्यादा गाठत आहेत. म्हणजे धरणांच्या सुरक्षेच्या संकटापेक्षा 138 कोटी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे आव्हान अधिक गंभीर आहे. अहवालात काही धक्कादायक निष्कर्ष आहेत. त्यात म्हटले की, भारतात सध्या 4  हजार 407 मोठी धरणे असून, त्यापैकी 1 हजार 115 धरणे 2025 पर्यंत 50 वर्षांचा टप्पा पार करतील. यापैकी काही धरणांचे आयुर्मान 100 वर्षे असणार आहे. त्याचबरोबर 2050 पर्यंत देशातील 4 हजार 250 धरणे 50 वर्षे पूर्ण करणार आहेत. या धरणांच्या डागडुजीबाबत सूचना देत, अहवालात त्यांची नियमित तपासणी आणि निरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. धरणांचे आयुष्य पूर्ण झाल्यानंतर त्याचा धोका निर्माण होणे स्वाभाविक आहे.
– कमलेश गिरी

Back to top button