माजी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जींच्‍या मुलीचा काँग्रेसला सल्‍ला, “पक्षाचा चेहरा …” | पुढारी

माजी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जींच्‍या मुलीचा काँग्रेसला सल्‍ला, "पक्षाचा चेहरा ..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सलग दोन लोकसभा निवडणुकीत (२०१४ आणि २०१९) काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यावर आता माजी राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्‍या मुलगी आणि लेखिका शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmistha Mukherjee ) यांनी काँग्रेसला सल्‍ला दिला आहे. ( Sharmistha Mukherjee Said Congress Should Think About Face Of The Party )

सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव

सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी १७व्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या निमित्त माध्‍यमांशी बोलताना शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्‍या की, २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव झाला होता, हे काँग्रेसला लक्षात ठेवण्याची गरज आहे. लोकसभेच्या दोन निवडणुकामध्‍ये राहुल गांधी हे काँग्रेसचा चेहरा होते. एखाद्या विशिष्ट नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्ष सतत पराभूत होत असेल, तर त्याचा विचार होणे गरजेचे आहे. पक्षाचा चेहरा कोण असावा, याचा विचार काँग्रेसने केला पाहिजे.

Sharmistha Mukherjee : काँग्रेस आजही प्रमुख विरोधी पक्ष

शर्मिष्ठा मुखर्जी म्हणाल्या की, काँग्रेस आजही देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. या पक्षाची देशाच्‍या राजकारणातील जागा निर्विवाद आहे; पण ती मजबूत कशी करायची हा प्रश्न आहे. याचा विचार करणे पक्षश्रेष्ठींचे काम आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही आपल्या डायरीत लिहिल्याप्रमाणे पक्षातील लोकशाही पुनर्स्थापना, सदस्यत्व मोहीम, पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुका आणि धोरणात्मक निर्णय या प्रक्रियेत तळागाळातील कार्यकर्त्यांना प्रत्येक स्तरावर सहभागी करून घेण्याची गरज असल्याचा पुन्‍नरुच्‍चारही त्‍यांनी केला. ( Sharmistha Mukherjee Said Congress Should Think About Face Of The Party )

लोकशाही म्हणजे फक्त बोलणे नव्हे, तर इतरांचे ऐकणेही खूप महत्त्वाचे

लोकशाहीत वेगवेगळ्या विचारधारा असतात, तुम्ही त्यांच्या विचारसरणीशी सहमत नसाल, पण त्या विचारसरणीचे अस्तित्व चुकीचे आहे, असे नाही. त्यामुळे संवाद होणे गरजेचे आहे. माझे वडील सक्रिय राजकारणात असताना संसदेतील गोंधळाच्या वेळी इतर पक्षांच्या सदस्यांशी चर्चा करण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना सहमती निर्माण करणारे मानले जात होते. लोकशाही म्हणजे फक्त बोलणे नव्हे, तर इतरांचे ऐकणेही खूप महत्त्वाचे आहे. लोकशाहीत संवाद असला पाहिजे ही त्यांची विचारधारा होती, असेही त्‍यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा : 

Back to top button