भारतात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर; 'टाईम'नं अधोरेखित केलं वास्तव
पुढारी ऑनलाईन डेस्क
एकाच सरणावर चार-पाच मृतदेहांना जाळणं अन् जळणाऱ्या प्रेतांचा उग्र वास हवेत पसरणं, ही भयानक परिस्थिती पाहून स्मशानभूमीत २४ तास शरीरबंद पीपीई किट घालून उष्णतेच्या धगीनं जीवाची लाही-लाही होत असणाऱ्या वयस्क कर्मचाऱ्यांना विचारलं, तर म्हणतात, “अख्खं आयुष्य माणसं जाळण्यातं गेलं; पण एवढ्या मोठ्या संख्येनं मृतदेह जळताना आणि जाळताना कधीच पाहिली नाहीत.” देशाची राजधानी दिल्लीत आणि आर्थिक राजधानी मुंबईत.
”आमच्याही जीवाची किंमत करा”
लोकसंख्येचा विस्फोट झालेल्या देशात कोरोनाबाधितांचा विस्फोट होणं सहाजिकच आहे. नव समाज माध्यमांतून स्मशानातील आणि कब्रस्तानातील अर्धवट गुंडाळलेल्या बॅगमधील मतदेह पाहून वैद्यकिय साधनांची कमतरता दिसून येते. हीच कमतरता पुन्हा आपल्या दिवसरात्र राबणाऱ्या सहकाऱ्यांच्या जीवावर उठणार आहे, हे निश्चित. कुणाच्या हातात ग्लोज नाहीत, कुणाकडे पीपीई किट नाही, मृतदेहांना झाकण्यासाठी पुरेसे बॅग्ज नाहीत, अशा प्रतिकूल परिस्थीतीत काम करणारे कर्मचारी आर्जवपणे विनवण्या करताहेत की, “आम्हालाही जीव आहे. आमच्या जीवाची किंमत करा. किमान ग्लोज आणि मास्क तरी द्या.”
खोटा आत्मविश्वास
एकीकडे दोन-दोन मास्क घालण्याचे कडक नियमावली दाखवली जात आहे तर, दुसरीकडे प्रत्यक्ष कोरोना रुग्णांना आणि मृतदेहांना हातळणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे संरक्षणात्मत साधणं नाहीत. मागील ५ महिने मागे जा… विद्यार्थी शाळेत जाऊ लागले होते, राज्यकर्ते राजकीय सभा घेऊ लागले होते, लग्नांमध्ये लोक आंनदात नाचत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर ‘आत्मनिर्भर भारता’चा गवगवा करत आपल्या भाषणातून सांगितलं होतं की, “आम्ही क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलियाच्या टीमवर आणि कोरोनाच्या साथीवर विजय प्रस्थापित केलेला आहे.”
कोरोनाबाधितांचा नवा रेकाॅर्ड
सकारात्मक विचार सकारात्मक परिणाम दर्शवितात, हे सांगत भारतीयांना उभारी देण्याचं काम जरी मोदींनी केलं असलं तरी, त्याच वेळी महत्वाच्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, हे साथीच्या रोगतज्ज्ञांनी सांगितलं होतं. मात्र, २१ फेब्रुवारीमध्ये भारतीय जनता पार्टीने ‘नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीवर विजय मिळविण्यात आपला देश यशस्वी झाला आहे’, असा ठराव मंजूर केला होता. त्यानंतर अवघ्या २ महिन्यांनी म्हणजेच २१ एप्रिल रोजी कोरोनाबाधितांचा सर्वोच्च आकडा गाठून जगात विक्रमी नोंद केली. यापूर्वी अमेरिकेने लाख कोरोनाबाधितांचा सर्वोच्च आकडा गाठून विक्रमी नोंद केली होती. एप्रिलमध्ये ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांचा आकडा गाठून अमेरिकेला मागे टाकले.
स्मशानातल्या लोखंडी पट्ट्या वितळताहेत
भारतातील सध्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की, लोक ऑक्सिजन अभावी मरताहेत. अत्यावस्थेतील रुग्णांना बेड मिळत नाहीत. रुग्णालये तुडूंब भरून वाहाताहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू झाला आहे. कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळांवर दबाव वाढला आहे. कोरोनाचे हे महाभयंकर संकट देशातील १.४ अब्ज लोकांवर थेट परिणाम करणारे ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांच्या शब्दात सांगायचं झालं तर, भारत हा कोरोना महामारीने नरक झालेला आहे. देशातील स्मशानभूमी २४ तास पेटलेल्या आहेत, आतातर स्मशानातल्या लोखंडी पट्ट्या वितळताहेत.
‘ते’ कार्यक्रमच सुपरस्प्रेडर आहेत
मागील वर्षांपासून टाळेबंदी घोषीत केल्यामुळे आणि दुसऱ्या लाटेत पुन्हा टाळेबंदी घोषीत केल्यामुळे अनेक तरुण मजुरांचे आपापल्या गावी स्थलांतर झाले. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहार मधील तरूण गावी गेले. हाताला काम नसल्यामुळे गरीबी मोठ्या प्रमाणात वाढली. सदस्यसंख्या जास्त असलेल्या कुटुंबात कोरोना वेगाने पसरतो आहे. १० पैकी ४ कुटुंबात कोरोनाची बाधा होण्याची शक्यताही बोलून दाखवली जात आहे. कोरोनाकाळातील नियम आणखी कठोर करून नागरिकांना त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्याऐवजी मोदी सरकारने राजकीय, धार्मिक कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली. आता असं म्हटलं जातंय की, “उत्तराखंडातील कुंभमेळा सर्वात मोठा सुपरस्प्रेडर आहे.” त्यामुळेच आपण ब्राझिललाही मागे टाकत कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये पुढे गेलो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः असं म्हणाले होते की, “इतक्या मोठ्या संख्येने आलेला जनसमुदाय मी पहिल्यांदाच पाहिला.”
‘आत्मनिर्भरते’चा अट्टाहास महागात पडला
सर्वात महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘आत्मनिर्भर भारत’ हा अट्टाहास महागात पडला, असंही तज्ज्ञ सांगतात. कारण, भारत बायोटेकची लस घेण्याच्या अट्टाहासापायी मोदी सरकारने फायझरची लस मंजूर करून आयात करण्याचे टाळले. परदेशी कंपन्या डोस निर्यात करण्यास उत्सुक होत्या. पण, आम्ही स्वदेशी लसीवर भर दिली. परिणामी, प्रतिदिन केवळ ०.२ टक्केच लोकांचे लसीकरण होत राहिले. तज्ज्ञ म्हणतात की, लसीकरण संदर्भातील भारताची धोरणं चुकीची ठरली.मोदी सरकारची आत्मसंतुष्टता आणि अतिआत्मविश्वासच आजच्या परिस्थितीला कारणीभूत ठरली. मोदी सरकारची ही बाब अक्षम्य आहे.
उशिरा सुचलेलं शहाणपण
मोदी सरकारला कोरोनाची परिस्थिती हातळण्यात यश आले नाही. परिणामी, कोरोना हाताबाहेर गेला. भारतातील परिस्थितीत चिघळत असताना पाहून ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, इतकंच नाही तर पाकिस्तान या देशांनीही आरोग्य क्षेत्रातील साधनांच्या पुरवठ्यासाठी मदतीचा हात पुढे केला. अमेरिकेने दिल्लीला व्हेंटिलेटर्स, टेस्ट किट्स, ऑक्सिजन पाठवले. तेव्हा कुठे मोदी सरकारच्या लक्षात आले की, आत्मनिर्भर भारतचा अट्टाहास योग्य नाही. मोदी सरकारने अमेरिकेच्या दातृत्वाकडे पाहून कोरोना लसींसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील बंदी उठवली. कारण, कोरोनाची दुसरी लाटेला तोंड द्यायचं असेल तर आपल्या देशातही कोरोनाची लस उत्पन्न होणं गरजेचं आहे.
मंद गतीने लसीकरणाचा प्रवास
आरोग्य तज्ज्ञांच्या मते असं सांगितलं जात आहे की, “सध्या भारतातील लसीकरणाचा वेग खूपच मंद गतीने सुरू आहे. केवळ ९ टक्के लोकांनाच लस मिळालेली आहे. तिसऱ्या लाटेला थोपवून धरायचं असेल तर वेग वाढवणं गरजेचं आहे.” मोदी सरकारने पहिल्यांदा कोरोनाची लस आयात केली नाही. नंतर लसीच्या आयातीचा निर्णय घेतला. परंतु, भारतात कोरोनाची लस निर्माण झाली नाही, तर त्याचा फटका आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिरम इन्सिट्यूटच्या मागे लस निर्माण करण्याचा तगादा लावला आहे. खरंतर बाहेरच्या देशांना आतापर्यंत १०० दशलक्ष डोस सिरमने द्यायला हवे होते. मात्र, २० दशलक्षच डोस देण्यात आले आहेत.
मोदी सरकारच्या पुढे कोरोनाचं हे मोठं संकट उभं राहिलेलं आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात असे दिसून आले आहे की, नरेंद्र मोदींबद्दलची लोकांची पसंती घसरलेली आहे. कारण, नरेंद्र मोदी या कोरोनाच्या संकटात टिकाव धरू शकतील की नाही, हे लोकांसाठी महत्वाची नाही. तर, लोकांना रुग्णालयात बेड, ऑक्सिजन मिळणं महत्वाचं झालेलं आहे. समाजसेवक म्हणतात की, लोकं वैद्यकिय मदतीसाठी आरडाताहेत आणि सरकार एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त आहेत.”