Raosaheb Danve : मुख्यमंत्री झाल्यापासून उध्दव ठाकरे मंत्रालयात किती वेळा आले? रावसाहेब दानवे | पुढारी

Raosaheb Danve : मुख्यमंत्री झाल्यापासून उध्दव ठाकरे मंत्रालयात किती वेळा आले? रावसाहेब दानवे

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला आले नाही. यात काही नवीन घडतय अस नाही. कारण, मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात किती वेळा आले? असा सवाल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाय. आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. (Raosaheb Danve)

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्बेत ठीक असून, ते सभागृहात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहीले नाहीत. यावर दानवे यांनी नागपुरात बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.भाजपचे वरिष्ठ नेते आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज नागपूर संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

Raosaheb Danve : मोहन भागवत यांची भेट

संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचे रावसाहेब दानवे यांनी भेटीनंतर सांगितले. रेल्वे राज्यमंत्री दानवे आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक पदाधिकारी संघ मुख्यालयात मुक्कामी आहेत. या सर्वांशी राबसाहेब दानवे यांनी चर्चा केल्याचे समजते.

दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांची तब्बेत लवकर सुधारावी अशी मी प्रार्थना करतो. लवकर त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होऊन महाराष्ट्राच्या सेवेत ते परत यावेत असे दानवे म्हणाले. ते आज सभागृहात उपस्थित नाहीत, यामध्ये नवीन काही नाही. कारण ते मुख्यमंत्री झाल्यापासून किती वेळा मंत्रालयात आले? त्यांनी राज्यात किती दौरे केलेत? राज्यावर आलेल्या संकटाला ते किती वेळा सामोर गेलेत? असे सवाल दानवेंनी केलेत.

मुख्यमंत्री आले काय आणि नाही आले काय

राज्यात अतिवृष्टीचा विषय, मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा विषय असेल यामध्ये त्यांचा सहभाग नसतो. याच कारण म्हणजे तीन पक्षांचे असणारे सरकार. हे तीनही पक्ष एकत्र येऊन कोणताही निर्णय करत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री आले काय आणि नाही आले काय, या राज्यातील जनता संयमी असल्याचे दानवे म्हणाले.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित राहत नाहीत, असा आरोप विरोधकांनी केली होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोज सभागृहात उस्थित होते. आमचे सरकार सर्व विषयांवर चर्चा करायला तयार असल्याचे आम्ही विरोधकांना सांगितले.

मात्र, विरोधी पक्षांनी शेवटपर्यंत गोंधळ घातला. आधारकार्ड लिंक, मतदार नोंदणी या बिलाला विरोधकांचा विरोध आहे. आठ वर्षांत केंद्र सरकारने कृषी, रेल्वे, उद्योग क्षेत्रासह अनेक विषयात चांगले काम केल्याचे दानवे म्हणाले.

Back to top button