अमरावती येथील हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी : चंद्रकांत पाटील | पुढारी

अमरावती येथील हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी व्हावी : चंद्रकांत पाटील

अमरावती : पुढारी वृत्तसेवा

त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना एक क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांच्या जमावाने रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये व गाड्या यांचा विध्वंस केला. या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

आज भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने या घटनेच्या निषेधार्थ निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना भेटून मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यायचे निवेदन सादर केले. यामध्ये त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून धार्मिक भावना भडकवून घडलेल्या दंगलेची प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीं मार्फत करावी, ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे, अशी मागणी शिष्‍टमंडळाने केली.

आमदार शिंदेंचा एका मताने पराभव करणारे ज्ञानदेव रांजणे आहेत तरी कोण?

या दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी, भारतीय जनता पार्टीच्या नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत , अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या सर्व मागण्या आम्ही फक्त राजकीय विरोधीपक्ष म्हणून न करता, ही घटना महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर हे निवेदन जसे आहे तसेच तसे न पाठवता जिल्ह्यातील याविषयासंदर्भातील घटनांचा जिल्हास्तरीय अहवाल सोबत पाठवा अशी विनंती देखील करण्यात आली.

याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात अराजकता माजली आहे. कोणत्याही गोष्टीवर शासनाचा वचक राहिला नाही. पोलिस यंत्रणांचे हप्ते, दडपशाही, न्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांना धाक दाखवण्यापुरती वापरली जात आहे. दंगलखोरांना अभय देण्याचे काम सुरु आहे. झुंडशाहीचा प्रकार घडत असताना आता पोलिसांवर देखील हल्ले होऊ लागले आहेत. फक्त जातीच्या राजकारणासाठी, सत्तेच्या हव्यासापोटी अशा गंभीर घटनेकडे कानाडोळा करण्याचे कार्य हे सरकार करत आहे.

२०१४ ते २०१९ मध्ये केंद्रातील मोदीजींचे सरकार आणि २०१४ ते २०१९ मध्ये राज्यात देवेंद्रजी यांचे सरकार असताना एकही दंगल घडली नाही. आता मात्र चाळीस हजाराचे मोर्चे निघत आहेत. याबाबतची माहिती पोलिस यंत्रणेला माहित नसणे हे दुर्दैवी आहे. अशा हिंसक मोर्चावर पोलिस कारवाई होत नाही.

अन्याया विरुद्ध लढा देण्यासाठी शांततेने सुरु असणाऱ्या मोर्चावर कारवाई असा अजब न्याय सुरु आहे. या घटनेची सखाेल चौकशी व्हायची असेल तर याची पाळेमुळे शोधून काढली पाहिजेत. त्यामुळे भाजपाच्या वतीने काल झालेली निदर्शने, धरणे, निवेदने हा सरकारला इशारा असल्याचे सांगितले. कान-नाक-डोळे बंद ठेवून आजचा दिवस पुढे ढकलणाऱ्या या राज्यकर्त्यांकडे राज्यातील जनता लक्ष ठेवून असून योग्य वेळी धडा शिकवेल असेही ते म्‍हणाले.  याप्रसंगी माजी मंत्री मा.सुभाषबापू देशमुख, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, भाजपा शहर संघटन सरचिटणीस अशोक देसाई, भाजपा ग्रामीण संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील, सरचिटणीस विजय जाधव, सरचिटणीस विठ्ठल पाटील, सरचिटणीस दिलीप मेत्रांणी, जिल्हा उपाध्यक्ष मा.राहूल देसाई यांची उपस्थिती होती.

हेही वाचलं का?

Back to top button