चंद्रपूर : जंगलात गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार | पुढारी

चंद्रपूर : जंगलात गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतीला लागणारे अवजारे बनविन्याकरिता लाकडे आणण्यासाठी जंगलात गेलेल्या तिघा शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज गुरूवारी (दि. १५) घडली आहे. ही घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील चिटकी बिटात घडली. रघुनाथ नारायण गुरनुले (वय 35) असे मृत्ताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवेगाव लोनवाही येथील तीन इसम शेतीच्या अवजारे बनवण्यासाठी चिटकी बिटातील जंगलात लाकडे आणण्यासाठी गेले होते.  तिघांपैकी रघुनाथ नारायण गुरनुले या व्यक्तीवर वाघाने हल्ला चढवत त्याला जागेवर ठार केले. अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्यात उर्वरित दोघेजण प्रचंड घाबरले. त्यांनी जागेवरून पळ काढत घटनेची माहिती गावामध्ये येऊन सांगितली. त्यानंतर गावातील नागरिकांनी जंगलात धाव घेतली. घटनेची माहिती वनविभाग व एफडीसीएम अधिकाऱ्यांना देण्यात आल. त्यांनी घटनास्थळी येऊन शोध घेतला असता  घटनास्थळापासून 30 ते 40 मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला.

सदर मृतदेह ताब्यात घेऊन तपासणी करता सिंदेवाही येथे पाठविण्यात आले. मृतक हा घरातील कमवता होता. एकुलता त्याचे पश्चात आई वडील व पत्नी व एक मुलगा आहे. त्याचे मृत्यने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झालेली आहे.

Back to top button