उद्धिष्टपूर्तीपेक्षा योजना लोकाभिमुख करण्याकडे बँकांचा कल असावा : भागवत कराड | पुढारी

उद्धिष्टपूर्तीपेक्षा योजना लोकाभिमुख करण्याकडे बँकांचा कल असावा : भागवत कराड

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल व्हावा यासाठी डिजीटल क्रांतीचा पुरस्कार केला. बँकेच्या उद्दिष्टपूर्तीपेक्षा योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय अर्थमंत्रालय, राज्यस्तरीय बँकर्स समिती, जिल्हा अग्रणी बँक नागपूर यांच्यावतीने हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे “विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे आर्थिक समावेशन आढावा बैठकीत मार्गदर्शन केले. खासदार रामदास तडस, अशोक नेते, सुनील मेंढे, डॉ. अनिल बोंडे, आमदार मोहन मते यावेळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), अटल पेन्शन योजना(एपीवाय), प्रधानमंत्री जनधन योजना (पीएमजेडिवाय), पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, किसान क्रेडिट कार्ड-पशुसंवर्धन, किसान क्रेडिट कार्ड -मत्स्यपालन, आदी महत्वाकांक्षी योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
सामाजिक असमतोल दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या या योजना आहेत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करताना परफॉर्मन्स ऑडिट करणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीतील कामगिरीचा अहवाल बँकांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
आर्थिक समावेशनासाठी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांच्या कामगिरी विषयी फडणवीस यांनी विदर्भातील जिल्हा निहाय माहिती जाणून  घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य नागरिकांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी या योजना आखल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांनी ही योजना लोकप्रिय व्हावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्व बँकर्सनी गांभीर्याने उद्दिष्ठपूर्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे, उपमुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री जनधन योजना ही महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या लाभार्थींसोबत बँकेचा समन्वय असावा. त्यासाठी संपर्क वाढवावा अशा सूचना त्यांनी केल्या. डीजीटल ट्रांजेक्शन संदर्भात बँक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात वाढ करा, असे निर्देश त्यांनी दिले. पीएमस्वनिधी योजनेबाबत विदर्भात चांगले कार्य झाले आहे, याबाबत फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले, राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष ए.बी.विजयकुमार यांनी प्रास्ताविक केले. समितीचे सदस्य सचिव राजेश देशमुख यांनी सादरीकरण केले.

Back to top button