अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना कोणताही दिलासा नाही : अनिल देशमुख
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आज सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला अशी टीका माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे.
राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत असताना शेतकऱ्यांना परत एकदा गाजर दाखविण्यात आले. परंतु जुन्याच योजनाचा उहापोह करण्यात आला. आधीच पिक विमा कंपन्याच्या नावाने ओरड आहे. अश्यात परत पंतप्रधान पिक विमा योजनेला चालना देण्याचे काम करण्यात येत आहे. यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार विकास दर 6.8 टक्केपर्यत घसरणार असून दुसरीकडे महसुली तूट व कर्जाचा बोजाही वाढतो आहे. अशा परिस्थीतीत नव्या घोषणांसाठी पैसा कसा उभारणार हे आजच्या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कुठेही दिसून आले नाही. एकुणच सर्वसामान्य जनतेची निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे. पुढील महानगर पालीका, नगर पालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेवून केवळ घोषणांचा बाजार आहे.