चंद्रपूर : वीज कोसळून बोकडांसह २६ शेळ्या ठार | पुढारी

चंद्रपूर : वीज कोसळून बोकडांसह २६ शेळ्या ठार

चंद्रपूर , पुढारी वृत्तसेवा : सिंदेवाही तालुक्यातील आलेसूर शेतशिवारात चराईसाठी नेलेल्या शेळ्यांच्या कळपावर वीज पडून बोकडांसह २६ शेळया ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

नवरगाव येथील मेंढपाळांनी ह्या शेळ्या चराईसाठी नेल्या होत्या. यात मालकांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे.

नवरगाव येथील बिर्रा जिगरवार, ज्ञानेश्वर मर्लावार, मल्ला बाकीरवार ,बुधाजी कंकलवार, बुधाजी रेगडवार, मनोहर कड्रीवार या शेळ्या मालकांचा सुमारे १३० शेळ्यांचा कळप आलेसूर गावालगतच्या शेतशिवारात चराईसाठी कैलास सिद्धमवार, मल्ला बाकीरवार ह्या मेढपाळांनी नेल्या होत्या.

दुपारी दीडच्या सुमारास तालुक्यासह या परिसरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळला. पावसामुळे शेळ्यांचा कळप आंब्याच्या झाडाखाली गोळा झाला.

दरम्यान, जोरदार सुरू असलेल्या पावसासोबत मेघगर्जना होवून आंब्याच्या झाडावर वीज पडल्याने ३-४ मोठया बोकडासह २६ शेळ्या जागीच ठार झाल्या. यात शेळ्यामालकांचे सुमारे ३ लाख रुपयाचे नुकसान झाले.

२६ शेळ्या विजेने ठार झाल्याची माहिती गावात होताच नागरीकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली.

आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी शेतकरी शेतीसोबत शेळीपालनाच्या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे.

मात्र नैसर्गिक संकटामुळे त्यांनी बघितलेल्या स्वप्नाचा चुराडा होत आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत प्रदान करावी अशी मागणी शेळी मालकांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button