चंद्रपूर : सेल्फीच्या नादात धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : सेल्फीच्या नादात धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सेल्फीच्या नादात धरणावर पर्यटनाकरिता आलेल्या दोन युवकांना धरणात बुडून आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना घडली. ही घटना गुरूवारी (25 ऑगस्ट) दुपारी वरोरा तालुक्यातील चारगाव येथील धरणावर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगाव बुज आणि वरोरा येथील हार्दिक विनायक गुळघाणे (रा. शेगाव बू.), आयुष चिडे (रा. वरोरा) हे दोघेजण काही मित्रांसोबत दुपारच्या सुमारास जवळच असलेल्या चारगाव धरणावर पर्यटनाकरीता आले होते. काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसाने चारगाव धरण तुंडूब भरले आहे. धरणावर पोहचल्यानंतर या ठिकाणचे मनमोहक दृश्य या तरूणांना सेल्फी काढण्यापासून रोखू शकले नाही. दरम्यान हार्दिकचा सेल्फी काढत असताना पाय घसरला आणि तो थेट धरणातील पाण्यात पडला. मित्र पाण्यात पडल्याने त्याला वाचविण्याकरता आयुष चीडे हा तरूण पुढे आला असता तोही पाण्यात पडला. यावेळी दोघांचाही धरणात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.

दोन्ही युवकांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. ग्रामस्थांनी बोट व लोखंडी गळाच्या सहाय्याने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आले.

Back to top button