सुरत-चेन्‍नई महामार्ग मोजणी 11 जुलैपर्यंत पूर्ण | पुढारी

सुरत-चेन्‍नई महामार्ग मोजणी 11 जुलैपर्यंत पूर्ण

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सुरत-चेन्‍नई महामार्गाची मोजणी अंतिम टप्प्यात आली आहे. याअंतर्गत 11 जुलैपर्यंत रोव्हरद्वारे पूर्ण गावांतील मोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतून हा महामार्ग जाणार आहे. दि. 5 जून 2022 पासून जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे.
सुरत-चेन्‍नई नवीन महामार्गाच्या मोजणीबाबतच्या आढावा बैठकीत शंभरकर बोलत होते.

बैठकीला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपजिल्हाधिकारी तथा महामार्गाच्या सक्षम अधिकारी अरुणा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप, अनिल विपत उपस्थित होते. वन, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख विभागाचे प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते. सुरत-चेन्‍नई हा महामार्ग ग्रीन कॉरिडॉर आहे. हे अंतर 1290 किमी असून हे अंतर जाण्यासाठी 30 तास लागत होते. या महामार्गामुळे 12 तासांनी अंतर कमी होऊन 18 तासांत हे अंतर पार होणार आहे. 8,200 कोटींचा हा प्रकल्प असून महामार्गामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. जमिनींच्या किमती वाढून मिळणार आहेत.

हा महामार्ग बार्शी तालुक्यातील 15 गावांतून, दक्षिण सोलापूरमधील चार गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील 16 अशा 35 गावातून महामार्ग जाणार होता. मात्र बार्शी तालुक्यात अजून घाणेगाव हे गाव वाढले आहे. महामार्गातील बार्शी तालुक्यातील सर्व गावाच्या जमिनीची मोजणी आज पूर्ण झाली. वाढलेल्या एका गावाची मोजणी सोमवारी पूर्ण होईल, दक्षिणमधील सर्व चारही गावांची मोजणी पूर्णण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सहा गावांची आतापर्यंत मोजणी झाली आहे. मोजणीचे काम गतीने पूर्ण केल्याने सर्व टीमचे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी अभिनंदन केले.

ते म्हणाले, सुरत-चेन्नई महामार्गासाठी तीनही तालुक्यातील जमिनीच्या मोजणीसाठी 10 रोअर मशिन देण्यात आल्या होत्या. यामुळे ही मोजणी अचूकपणे करण्यात आली आहे. तिन्ही तालुक्यातील एकूण 642.1104 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. यामुळे सर्व संबंधित विभागांनी आपापली कामे रोखपणे पार पाडावीत. संबंधित विभागांनी मोजणीच्या वेळी उपस्थित राहून काम केले आहे, जेणेकरून मोजणी सुरू असतानाच पंचनामे, मूल्यांकन करणे सोपे झाले आहे. अक्कलकोट तालुक्यात काम कमी झाल्याने दोन टीमद्वारे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मोजणीच्या ठिकाणी पंचनामे, मूल्यांकन करण्यासाठी कृषी, सार्वजनिक बांधकाम, वन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

15 जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करा

अक्कलकोट तालुका सोडला तर मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजणी झालेल्या गावांचा मोजणीचा घोषवारा (जीएम शीट) प्रत्येकांनी सादर करावा. यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने सहकार्य करावे. थ्रीडी अधिसूचना जाहीर करावयाची असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने 15 जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.

Back to top button