पाटण : आपदग्रस्तांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना व्हाव्यात | पुढारी

पाटण : आपदग्रस्तांसाठी कायमस्वरुपी उपाययोजना व्हाव्यात

पाटण ः गणेशचंद्र पिसाळ गतवर्षी पाटण तालुक्यात झालेल्या अभूतपूर्व अशा ढगफुटी, अतिवृष्टी,भूस्खलनामध्ये अब्जावधींची सार्वत्रिक हानी झाली. मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल, साकव, पाणी योजना आदी सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले. या सार्वजनिक विकासासाठी तात्पुरत्या उपाययोजनांसाठी लाखोंचा खर्च करूनही ही कामे पुन्हा पाण्यातच जात आहेत.

सार्वत्रिक व्यवस्था कायमस्वरूपी सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी कोट्यवधींच्या निधीची आवश्यकता आहे. त्याचवेळी ती कामे होताना प्रामाणिक अधिकारी, ठेकेदार गरजेचे असून टक्केवारीच्या गणितात जाणीवपूर्वक तात्पुरत्या उपाययोजनांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च आणि नैसर्गिक आपत्ती इष्टापत्ती समजून तालुक्यात सुरू असलेली कामे खरच दर्जेदार होत आहेत का, याची पाहणी होणे गरजेचे आहे.
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भूकंप पुनर्वसन निधी समितीची स्थापना झाली. मात्र त्यातून मिळणारा विकास निधी हा नक्की त्या आपत्तीग्रस्तांसाठी वापरला की त्याचा राजकीय सोयीसाठी यांचा वर्षानुवर्षे वापर झाला हा देखील संशोधनाचा विषय आहे.

आतापर्यंत भूकंपाने ग्रासलेल्या या तालुक्याला दहा-बारा वर्षात सह्याद्री व्याघ्र, पश्चिम घाट प्रकल्प, इको सिन्सिव्ह झोन, कोयना अभयारण्य अशा मानवनिर्मित प्रकल्पांमुळे स्थानिकांचे जगणेही असह्य झाले आहे. अतिवृष्टी येथे कायमच, मात्र गतवर्षी भूस्खलनामुळे संपूर्ण तालुकाच निसर्गाने खिळखिळा केला.बहुसंख्य गावात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. अनेकांची कुटुंबे, घरे, शेती, शेतजमीन, पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. त्याचवेळी सार्वजनिक व्यवस्थाही कोलमडून पडली. आपत्ती काळात मदतीचा ओघ सुरू होतो. शासन स्तरावरून लोखांचा निधीही प्राप्त होतो.

मात्र त्याचा प्रत्यक्ष विनीयोग प्रामाणिकपणे होत नसल्याचा अनुभव आपद्ग्रस्त कुटुंबियांना व गावाना येत आहे. त्यामुळे तालुक्यातील सार्वजनिक व्यवस्थेचे कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीचे पुनर्वसन अपेक्षित असेल तर येथे त्याच कामेही दर्जेदार व भरीव स्वरूपाची होणे गरजेचे आहे. आपत्ती काळात केवळ सहानुभती काही कामाची नाही. तर आपद्ग्रस्तांसाठी भरीव कामे मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वत्रिक सकारात्मक पावले उचलणे ही तितकेच गरजेचे बनले आहे.

  • आपत्ती निधीतून भरीव कामे अपेक्षित
  • आपद्ग्रस्त जनतेच्या समस्या कायम असल्याने नाराजी
  • प्रशासनाकडून उपाययोजना आवश्यक

आपत्तीची टांगती तलवार जनतेच्या डोक्यावर कायम..

नैसर्गिक आपत्तीचे माहेरघर म्हणून पाटण तालुक्याची ओळख असून या आपत्तीचा वर्षानुवर्षे स्थानिक लोक सामना करत आहेत. एका बाजूला संबंधित लोकांचे जनजीवन विस्कळीत व धोकादायक बनले आहे, त्याचवेळी दुसरीकडे याच आपत्तींचा गैरफायदा घेत केवळ कागदोपत्री विकास हेच या तालुक्यासाठी सार्वत्रिक शोकांतिका ठरत आहे. पूर्वीपासून भूकंपाची कायमची टांगती तलवार तालुक्याच्या डोक्यावर आहेच, कायमच भूकंप उशाला घेऊन आणि जीव मुठीत धरून स्थानिकांना जगावे लागते.

Back to top button