

विटा: सांगली जिल्ह्यातील विटा येथील स्टील सेंटर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला सोमवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत एकूण चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून दुकानाला लागलेली आग आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. शॉर्टसर्किटमुळे किंवा दुकानातील फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतांमध्ये गरोदर महिलेचाही समावेश असून भावाच्या लग्नानिमित्त ती विटा येथे आली होती. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे.
सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. एकूण तीन मजली इमारतीमध्ये सर्वात खालच्या इमारती मध्ये दुकान आहे. तर वरच्या दोन मजल्यांवर जोशी कुटुंबाचे वास्तव्याला आहे.या दुकानाला लागलेली आग आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
आगीचे कारण अस्पष्ट
ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दलचे कारण समोर आलेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे किंवा दुकानातील फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मृतांची नावे काय?
या आगीत दुकान मालक विष्णू पांडुरंग जोशी (वय ४७), त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी (वय ४२), मुलगी प्रियांका योगेश इंगळे (वय २५) आणि नात सृष्टी योगेश इंगळे ( वय २) या चौघांचा होरपळून मृत्यू झाला.
भावाच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या बहिणीचा वेदनादायी अंत
प्रियंका इंगळे हिचे सासर गोव्यात आहे. 16 नोव्हेंबरला भावाचे लग्न असल्याने ती माहेरी विट्यात आली होती. प्रियंका ही गरोदर होती. रविवारी लग्नाच्या खरेदीनिमित्त जोशी कुटुंबीय दिवसभर बाहेर होते. रात्री उशिरा ते घरी परतले होते. धावपळ, दगदग यामुळे जोशी कुटुंबीय सकाळी लवकर उठले नसावं असे स्थानिकांना वाटले.
सकाळी शटरमधून धूरीचे लोट बाहेर आले अन्...
सकाळी साडेआठच्या दरम्यान दुकानाच्या रोलिंग शटर मधून आणि कडेच्या फटीतून धुरीचे लोट येत असल्याचे आजूबाजूच्या लोकांना दिसताच स्थानिकांना शंका आली. त्यांनी वरच्या मजल्यावरील दुकान मालकांना हाका मारली परंतु काहीही उत्तर आले नाही. दुकानाच्या वरच्या दोन मजल्यातील लोकांपर्यंत आवाज जात नसावा, असं सर्वांना वाटत होते.
काहींनी शटर फोडून घरात अडकलेल्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस शटर फोडले तेव्हा आगीच्या ज्वाळा आणि धुरांचे लोट एकदम बाहेर पडले. सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग आस पासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु, बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले. विटा पालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाला.
काही नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनाही तात्काळ पाचारण करण्यात आले. तो पर्यंत घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली. या अचानक लागलेल्या आगीत इमारती च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील सहाजण अडकले आहेत अशी माहिती मिळताच त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाले.
एकच मार्ग आणि दाटीवाटीचा परिसर
इमारतीत वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. शिवाय या इमारतीच्या दोन्ही बाजूंना एकमेकांना चिटकून घरं असल्याने आग विझवण्यासाठी आणि मदत कार्यात अडथळे येत होते. आगीची दाहकता आणि एकूणच परिस्थिती लक्षात घेत विटा पालिकेचा अग्निशमन अपुरा पडतो हे लक्षात आल्याने सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कडेगांव नगरपंचायतचा अग्निशमन बंब, कुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब, उदगिरी कारखान्याचे अग्निशमन बंब, पलुस येथील पालिकेचा अग्निशमन बंब, तासगाव पालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण सहा अग्निशमन बंब मागविण्यात आले. दुपारी एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
दोन जखमी
दरम्यान, या आगीमध्ये विष्णू जोशी यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलगी आणि नातीचा भाजून मृत्यू झाल्याचे समोर आले. तर त्यांचे दोन मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे.