सांगली: आटपाडीत विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू
![निशिकांत जाधव](https://d2n2y7fp2ncdvv.cloudfront.net/files/2024/05/17200442/Untitled-design-1-100.jpg)
आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : आटपाडी येथील स्वतंत्रपूर खुल्या वसाहतीजवळ विहिरीत मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेल्या निशिकांत राजेंद्र जाधव (वय २१ रा. कोष्टी गल्ली, आटपाडी) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना आज (दि.१७) दुपारी घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
निशिकांत जाधव विहिरीत कसा बुडाला?
- निशीकांत राहुल विलास राजमाने यांच्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता.
- निशिकांतने विहिरीत उडी घेतली. त्यानंतर तो पुन्हा वर आलाच नाही.
- विहिरीत उतरून निशिकांतचा शोध घेतला. पण तो काही सापडला नाही.
- सांगली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान निशीकांत आपल्या मित्रांसमवेत स्वतंत्रपूर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत राहुल विलास राजमाने यांच्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. अन्य युवकही पोहण्यासाठी आले होते. तर काही युवक पोहणे संपवून विहिरीतून बाहेर पडत होते. यावेळी निशिकांतने पुन्हा एक उडी विहिरीत घेतली. तो पुन्हा वर आलाच नाही. मित्रांनी काहीवेळ तो वर येण्याची वाट बघितली. त्यानंतर विहिरीत उतरून निशिकांतचा शोध घेतला. पण तो काही सापडला नाही.
आटपाडी तलावातून जाणाऱ्या कालव्याजवळ असलेली ही विहीर तुडूंब भरलेली आहे. या विहिरीत पन्नास फुटापेक्षा अधिक पाणी आहे. त्यामुळे निशिकांतची शोध मोहीम राबविण्यास अडथळे येत आहेत. विहिरीतील पाणी काढण्यासाठी विद्युत पंप सुरू करण्यात आले आहेत.
आटपाडी तलावाच्या पाण्याचा कालवा विहिरीजवळून जात असल्याने विहिरीतील पाणी उपसा करण्यात देखील अडथळे येत आहेत. ही शोध मोहीम असफल झाल्याने अखेर सांगली येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे. निशिकांतचा मृतदेह काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. सांगलीच्या रेस्क्यू टीम ने तासभर शोध मोहीम राबवून निशिकांतचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. आयुष हेल्पलाईन टीम कुपवाड अविनाश पवार व सहकाऱ्यांनी शोध मोहीम यशस्वीपणे राबवली
हेही वाचा