अजितदादांना पैलवान चंद्रहार पाटलांचा चकवा; सांगलीत राजकीय ‘दंगल’ | पुढारी

अजितदादांना पैलवान चंद्रहार पाटलांचा चकवा; सांगलीत राजकीय 'दंगल'

विजय लाळे

विटा; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील काही मोजक्या लोकांना बुधवारी (दि. २३) राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटाचे विशेष बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलेले होते. यामध्ये डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रावर पाटील यांचाही समा वेश होता. मात्र अजितदादा गटाचे आमंत्रण पैलवान चंद्रहार पाटील यांनी धुडकावल्याची चर्चा आज दिवस भरात संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात गट बांधण्याची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतली आहे. त्यांनी काल पहिला मोठा डाव टाकत जिल्ह्यातील काही राजकीय पैलवान आपल्या आखाड्यात दाखल करून घेतले. त्याचवेळी त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठीही डाव टाकण्यात आला होता, मात्र चंद्रहार यांनी तूर्त राज्यातील राजकीय गोंधळाच्या स्थितीत थांबा आणि पाहा, अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी चंद्रहार पाटील यांनी बुधवारी मुंबईला चर्चेसाठी बोलावले होते. त्यांच्या स्विय सहायकाने थेट फोन करून चंद्रहार यांना निमंत्रण दिले. त्याचवेळी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यासह पैलवान भीमराव माने, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पद्माकर जगदाळे आदी मंडळींना मुंबईत बोलावण्यात आले होते. ही मंडळी तिकडे बैठकीत हजर झाली, मात्र चंद्रहार पाटील यांनी या निमंत्रण सापळ्यात न अडकता शांत राहण्याचा निर्णय घेतला.

चंद्रहार पाटील यांचे नाव सध्या लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत

चंद्रहार पाटील यांचे नाव सध्या लोकसभा निवडणुकीतील प्रमुख स्पर्धक म्हणून पुढे येत आहे. त्यांनी अधिकृत तशी घोषणा केलेली नसली तरी वाढदिवस बॅनर मधून तेच चित्र समोर आणण्याच्या त्यांच्या समर्थकांनी प्रयत्न केला. अशावेळी अजितदादा गटाच्या निमंत्रणानंतर त्यांचे कसब पणाला लागले, मात्र त्यांनी राजकारणातला कोणताच निर्णय गाईगडबडीत घेणार नाही, असे सांगत मुंबईला जाणे टाळले. याबाबत चंद्रहार पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,” अजितदादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कडून मला मुंबईला बोलावण्यात आले होते. काही विषयांवर चर्चा करायची आहे, असे निमंत्रण होते. परंतू सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता कोणताही निर्णय गाईगडबडीत घ्यायचा नाही. माझे कुस्ती क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र आणि रक्तदान मोहिम या विषयावर काम सुरु आहे. त्याबाबत आवश्‍यक ता भासली तर अजितदादांसह शरद पवार साहेब, जयंत पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेईन” असे सांगितले आहे.

Back to top button