खासदार संजय पाटील यांच्या तासगाव साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप

खासदार संजय पाटील यांच्या तासगाव साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप
Published on
Updated on

तासगाव; पुढारी वृत्तसेवा :  खा. संजय पाटील यांच्या तासगाव व नागेवाडी या साखर कारखान्यांना पाठविलेल्या ऊसाची बीले अद्यापही मिळाली नाहीत. यामुळे आक्रमक शेतक-यांनी तासगाव कारखान्याच्या अकाऊंट आणि शेती विभागाच्या कार्यालयांना शुक्रवारी दुपारी टाळे ठोकले. दरम्यान कारखाना प्रशासनाने सोमवारी ऊसबिलांचे धनादेश देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपस्थित असलेले शेतकरी कारखाना स्थळावरुन परत गेले.

तासगाव आणि नागेवाडी हे दोन्ही कारखाने खासदार संजय पाटील चालवतात. कारखान्यांचे धुराडे पेटवताना खासदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना ऊस घालण्याचे आवाहन केले होते. शिवाय चांगला दर देण्याचीही ग्वाही दिली होती. शेकडो शेतकऱ्यांनी खासदार पाटील यांच्यावर विश्वास ठेवून कारखान्यांना ऊस पाठवला. मात्र गेल्या आठ – नऊ महिन्यात शेतकऱ्यांना ऊसाची बीले मिळालेली नाहीत.

गेल्या काही महिन्यात खासदार संजय पाटील यांच्या विरोधात ऊस बिले मिळावीत, ही मागणी करत विविध संघटनांनी आंदोलने केली. मोर्चा, ठिय्या, भीक मांगो आंदोलन करुन शेतकऱ्यांनी खासदार संजय पाटील यांना धारेवर धरले आहे. आंदोलनांच्या वाढत्या तीव्रतेनंतर २० ते २२ कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. पण शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची ऊसबिले अजून खासदार संजय पाटील यांच्या कारखान्याकडे अडकलेली आहेत.

ही थकीत बिले तातडीने मिळावीत यासाठी शेतकरी कारखान्याकडे सातत्याने हेलपाटे मारत आहेत. कारखान्याचे प्रशासन व खासदार संजय पाटील शेतकऱ्यांना आजिबातच दाद देत नाहीत. यामुळे तीव्र संतप्त विसापूर, खंबाळे, आळसंद, बोरगाव भागातील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी शुक्रवारी कारखाना कार्यस्थळावर जमा झाले.

१० ऑक्टोबरला बिले मिळतील

त्याठिकाणी शेती आणि अकाउंट विभागात असणाऱ्या कारखाना प्रशासनाला ऊसबिले कधी मिळणार, असा जाब विचारला. अधिकाऱ्यांनी १० ऑक्टोबरला बिले मिळतील, असे सांगितले. शेतकऱ्यांनी १० तारखेचे धनादेश द्यावेत, अशी मागणी केली. परंतू धनादेश पाहिजे असतील तर ते ३० ऑक्टोबरचे मिळतील, अशी ताठर भूमिका कारखाना प्रशासनाने घेतली.

यातूनच शेतकरी व कारखाना प्रशासनामध्ये वादावादी झाली. यावेळी काहींनी कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांना फोन लावून त्यांनी कारखान्यावर यावे, अशी मागणी केली. आर. डी. पाटील यांनी आज येऊ शकत नसल्याचे सांगितले.

कारखाना कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा

संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेती व अकाउंट विभागातील अधिकाऱ्यांना बाहेर काढून दोन्ही विभागांना कुलूप ठोकले. ऊस बिले मिळणार नाहीत तोपर्यंत कारखान्याचा कोणताही विभाग चालू देणार नाही, अशी भूमिका त्या शेतकऱ्यांनी घेतली. काही काळ तणाव निर्माण झाला.
शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहून कारखाना प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. अखेरीस सोमवारी ऊस बिलाचे धनादेश देण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले. आश्वासनानंतर शेती आणि अकाऊंट विभाग कार्यालयांना ठोकलेले कुलूप काढण्यात आले. दरम्यान, सोमवारी ऊस बिलाचे धनादेश मिळाले नाहीत तर पुन्हा एकदा कारखाना कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

 यावेळी नामदेव माने, अजय माने, भीमराव माने, प्रताप माने, हरिभाऊ माने, महेश पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचलत का?

https://fb.watch/8mMZPho95f/

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news