इस्लामपूर: दलबदलू नाईकांना जनता थारा देणार नाही : महाडिक
इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : शिवाजीराव नाईक यांनी राजकारणासाठी संस्थांचा वापर केल्याने त्या अडचणीत आल्या. यामध्ये भाजपा व इतरांचा संबंध येतोच कुठे? स्वार्थासाठी सातत्याने पक्ष व भूमिका बदलणार्या नाईक यांना मतदारसंघातील जनता आता थारा देणार नाही, असा पलटवार भाजप कार्य समितीचे सदस्य सम्राट महाडिक यांनी शिवाजीराव नाईक यांच्यावर केला आहे.
पत्रकारांशी बोलताना सम्राट महाडिक म्हणाले, भाजप सोडताना नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आपणावर टीका केली आहे. भाजपामुळे त्यांच्या संस्था अडचणीत आल्याचे ते सांगत आहेत. मुळातच त्यांनी आजपर्यंत राजकारणासाठीच संस्थांचा वापर केला आहे. ते ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले तो पक्ष मतदारसंघात वाढावा यासाठी किती योगदान दिले? त्यांच्या संस्था अडचणीत याव्यात म्हणून कोणाचा हस्तक्षेप असण्याचा प्रश्नच नाही.