पुणे : पुढारी वृत्तसेवा
अतिउष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाण्याच्या तुटवड्यामुळे व काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोथिंबीर, मेथीसह अन्य पालेभाज्यांच्या उत्पादनासह दर्जावर परिणाम झाला आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून, दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या जुडीचे भाव तीस ते चाळीस रुपयांवर पोहोचले आहेत.
गुलटेकडी मार्केट यार्डात पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा या विभागातून भाज्यांची आवक होते. सध्या पुणे विभागातून पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी नाशिक, लातूर, सिन्नर परिसरातून पालेभाज्यांची आवक वाढली आहे. यामध्ये नाशिक, लातूर येथून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर दाखल होत आहे.
मागील पंधरवड्यात लातूर परिसरात पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका कोथिंबिरीला बसला आहे. अन्य भागात उष्णतेमुळे उत्पादनासह पालेभाज्यांच्या प्रतवारीत घट झाल्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. परिणामी घाऊकसह शहर व उपनगरांतील किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे दर वधारले असल्याची माहिती भाजीविक्रेते चरण वणवे यांनी दिली.