पुणे : ‘एसआरए’च्या अर्धवट प्रकल्पांची तपासणी करणार ; फडणवीस यांचे आश्वासन
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्याने प्रकल्प रखडले आहेत. अशा अर्धवट प्रकल्पांची तपासणी करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुनील कांबळे यांच्या लक्षवेधीवर दिले आहे. शहरात कासेवाडी, मंगळवार पेठ, लोहियानगर, ताडीवाला रोड, नाना पेठ इत्यादी ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाची कामे सुरू आहेत. यापैकी बरेच प्रकल्प अर्धवट आहेत. एसआरएकडे स्वतःचे मनुष्यबळ नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तपासणी होत नसल्याने प्रकल्पांची देखरेख व तांत्रिक तपासणी होत नाही.
लोहियानगर येथील झोपडीधारकांना बिबवेवाडी येथे तात्पुरती राहायची व्यवस्था केली आहे. मात्र, तेथे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. लोहियानगर येथे होत असलेल्या प्रकल्पाचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना स्वतःचे घर मिळण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत आहे. नाना पेठेतील प्रकल्प पूर्ण झालेला असून, तेथे लाभधारकांना सोयीसुविधा मिळत नाहीत. ताडीवाला रोड येथील पानमळा प्रकल्पातील झोपडपट्टीधारकांना विकसक व अधिकार्यांच्या संगनमतामुळे हक्काचे घर मिळत नाही, अशा अडचणी आमदार कांबळे यांनी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडल्या. त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व तक्रारींची चौकशी करून अर्धवट राहिलेल्या कामांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले.